बिहारच्या निकालाचा राज्याच्या राजकारणावर व्यापक परिणाम
शिंदे, पवारांची बार्गेनिंग पॉवर घटणार; महाविकास आघाडीत एकजुटीची शक्यता
विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : २० वर्षांच्या अँटी-इनकम्बन्सी मात देत बिहारमध्ये ‘एनडीए’ने दणदणीत बहुमत मिळवले आहे. याचे परिणाम महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होतील. त्याचबरोबर महायुतीतील इतर दोन घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. हा निकाल महाविकास आघाडीला एकसंध करण्याचे कारण ठरू शकतो, असा सूरही व्यक्त केला जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने २०० हून अधिक जागा जिंकत सत्ता मोठ्या बहुमताने राखली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, नितीश कुमार यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. विरोधी पक्षाने निवडणुका अत्यंत नियोजनबद्ध आणि ताकदीने लढवूनही त्यांचा पराभव झाल्याने विरोधकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दुसरीकडे भाजप कार्यकर्ते या स्थानिक निवडणुका अधिक उत्साह व जोमाने लढवतील, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. बिहारच्या विजयामुळे निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाचा महायुतीला फायदा होईल, असा अंदाजही बहुतांश राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
बार्गेनिंग पॉवर वाढणार
हरियाना, महाराष्ट्रापाठोपाठ बिहारमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागावाटपात भाजपचा वरचष्मा असेल. यासोबत महायुतीच्या इतर घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर घटण्याचा धोका राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या निकालामुळे शिवसेना व अजित पवारांचा पक्ष बॅकफूटला जाण्याची शक्यता आहे. पुणे जमीन घोटाळाप्रकरणी त्याची चुणूक दिसली.
मतदानाची टक्केवारी वाढूनही बिहारमध्ये विरोधी पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. भाजपला निवडणुका जिंकण्याचा ‘फॉर्म्युला’ मिळाला आहे. जोपर्यंत त्याची तोड विरोधकांकडून तयार होत नाही तोपर्यंत परिस्थितीत मोठा बदल होणार नाही. विधानसभा निकालाप्रमाणेच महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपचा वरचष्मा राहील, असे चित्र आहे.
- हरीष वानखेडे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
..
बिहारचा निकाल सांगतो, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एकत्र यावेच लागेल. केवळ आघाडी करून चालणार नाही. घटक पक्षांतील अंतर्गत समन्वय मजबूत असावा लागेल. नियोजनही अधिक सूक्ष्म करावे लागेल.
- डॉ. सुमित म्हसकर, प्राध्यापक, ओ. पी. जिंदाल ग्लोबल विद्यापीठ
...
‘ईव्हीएम’च्या घोळाचा मुद्दा आता संपला आहे. आता विरोधकांनी लोकांना भावतील असे मुद्दे उचलले, तर त्यांना संधी आहे. काँग्रेसने वेगळे लढण्याची खुमखुमी दाखवली तर ते त्यांच्या पायावर धोंडा मारून घेतील.
- प्रताप आसबे, राजकीय विश्लेषक
...
बिहारमध्ये सुशासनासाठी जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. या निकालामुळे महाराष्ट्रातील मतदारांच्या मनातली अस्पष्टता दूर होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.
- सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ नेते, भाजप
....
बिहारच्या निकालामुळे आम्ही निराश आहोत, पण हताश नाही. नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात. त्यामुळे आम्ही कमबॅक करू, असा आम्हाला विश्वास आहे.
- अमर काळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.