सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत वाशी प्रभागात भाजप उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटकर यांच्याविरोधात भाजपचे नीलेश भोजने उमेदवार होते; मात्र भोजने यांचा अर्ज बाद झाल्याने नाईक गटाला निकालाआधीच फटका बसला आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी (ता. ३१ डिसेंबर) पूर्ण झाली आहे. या आकडेवारीनुसार, संपूर्ण महापालिका क्षेत्रात दाखल झालेल्या ९५६ अर्जांपैकी ८३९ अर्ज वैध, तर ११७ अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यात वाशी विभागात भाजपच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या छाननी प्रक्रियेत वाशी विभागात दाखल झालेल्या १०२ अर्जांपैकी १०१ अर्ज वैध ठरले असून फक्त प्रभाग क्रमांक १७-अ मधील भाजपचे उमेदवार नीलेश भोजने यांचा अर्ज अवैध ठरल्यामुळे शिवसेनेने नाईक गटाला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या गणिताला निर्णायक वळण मिळाले आहे. या घडामोडीमुळे प्रभाग १७-अ मधील लढत पूर्णतः एकतर्फी होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
शिवसेनेने खाते खोलले
भाजपचा एक उमेदवार मैदानाबाहेर गेल्याने याचा थेट फायदा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर आणि त्यांच्या संपूर्ण पॅनेलला होणार असल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय जाणकारांच्या मते, १७-अ सह पॅनेल १७ च्या सर्व जागा या प्रभागात मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याने आता शिवसेनेच्या नगरसेवक संख्याबळाचे खाते खोलण्यात जमा झाले आहे आणि हा नाईक गटाला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
नाईक गटाच्या वर्चस्वाला धक्का
या पार्श्वभूमीवर, ही घटना केवळ एका प्रभागापुरती मर्यादित न राहता नवी मुंबईच्या राजकारणात मोठा संकेत देणारी ठरत आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या प्रभावाला जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी थेट धक्का दिल्याचे या घडामोडीतून स्पष्ट होत असल्याची चर्चा आहे. वाशीतील हा निर्णय म्हणजे आगामी निवडणुकीत गणेश नाईक गटाच्या राजकीय वर्चस्वाला मिळालेला मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना शिंदे गटाची चोख तयारी
शिवसेनेची नियोजनबद्ध तयारी, अचूक कागदपत्रांची पूर्तता आणि रणनीतीची धार अधोरेखित करणारे मानले जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवसेनेने नवी मुंबईत आपल्या नगरसेवकांच्या संख्याबळाच्या खात्याला उघडण्याची ही पहिली ठोस सुरुवात आहे. वाशी प्रभागातून मिळालेला हा लाभ आगामी प्रभागांमध्ये शिवसेनेचा आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. नामनिर्देशन छाननीनंतर आता सर्वांचे लक्ष माघार प्रक्रियेवर केंद्रित झाले असून, येत्या काही दिवसांत नवी मुंबईतील निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
- नेरूळ विभागात २८ अर्ज
- घणसोली विभागात तब्बल ३९ अर्ज
- वाशी विभागात केवळ एकच अर्ज बाद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.