उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : शहरातील वाढत्या वेगवान वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून आता सामाजिक संस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. मोरयानगरी ते श्रीराम पेट्रोल पंप परिसरातील नव्याने तयार झालेल्या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विठाई प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गरड यांनी या संदर्भात उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मोरयानगरी, व्ही.टी.सी. ग्राउंड ते श्रीराम पेट्रोलपंप या दरम्यान नुकताच नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, रस्ता सुस्थितीत व सरळ असल्याने वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, रोज अपघातांच्या घटना घडत आहेत. या मार्गावर प्रचंड लोकवस्ती, मंदिर परिसर, तसेच लहान मुलांची वर्दळ असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ११ फेब्रुवारीला महादेवनगर येथील रहिवासी नागेश नागरे यांचा या रस्त्यावर वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे तातडीने या रस्त्यावर योग्य त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सीसीटीव्हीसाठी रस्त्यालगत खोदलेले खड्डे अद्याप व्यवस्थित बुजविण्यात आलेले नसल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. संबंधित खड्डे काँक्रीट टाकून तत्काळ दुरुस्त करावेत, अशीही विनंती निवेदनात करण्यात आली आहे. दोन्ही विषयांवर त्वरित कारवाई झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचे प्राण वाचतील आणि परिसरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास गरड यांनी व्यक्त केला आहे.
---
विकास महत्त्वाचा आहे; पण नागरिकांची सुरक्षितता त्याहून महत्त्वाची आहे. मोरयानगरी ते श्रीराम पेट्रोल पंप परिसरात वाढत्या वेगामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गतिरोधक तत्काळ बसवून आणि सीसीटीव्हीसाठी खोदलेले खड्डे प्रशासनाने बुजवावे, अशी मागणी आहे.
- प्रदीप गरड, अध्यक्ष, विठाई प्रतिष्ठान
उल्हासनगर : मोरयानगरी ते श्रीराम पेट्रोल पंप परिसरात वारंवार अपघात घडत आहेत.