जव्हार परिसरात
बिबट्याचा वावर
जव्हार, ता. २० ः ताडाची माची जंगल परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याने शेतकऱ्याची गाय फस्त केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २०) दुपारी घडली. गेल्या दोन वर्षांपासून सोनारआळी परिसर व मागील दरी भागात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असताना वनविभागाकडून काही उपाय करण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ताडाची माची या जंगल परिसरात चरण्यासाठी गेलेल्या गाईवर बिबट्याने अचानक झडप घालत तिला सुमारे १२ फूट जंगलात फरपटत नेले. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वारंवार होत असलेल्या घटनांनंतरही ठोस उपाययोजना न केल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिबट्यांचा वाढता वावर थांबवण्यासाठी तातडीने पिंजरे लावणे, गस्त वाढवणे, कॅमेरे बसवणे व प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वनविभागाकडून या घटनेचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्यात येईल, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवणे व जनजागृतीसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती उपवनसंरक्षक सैफून शेख यांनी दिली.