तुर्भे, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच १५० नव्या सीएनजी बसगाड्यांची भर पडणार आहे. मार्चअखेरपासून या बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार आहेत. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे निर्माण झालेली बसची कमतरता दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरणपूरक आणि तुलनेने अधिक विश्वासार्ह सेवा देण्यासाठी या वेळी इलेक्ट्रिक बसऐवजी सीएनजी गाड्या खरेदीवर भर देण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) सध्या सुमारे ५०० बसगाड्यांद्वारे सेवा देत असून, दररोज ४०० ते ४२५ बस रस्त्यावर धावत आहेत, मात्र वाढत्या प्रवासीभारामुळे ही संख्या अपुरी ठरत असल्याने प्रवाशांना अनेकदा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नव्या बस दाखल झाल्यानंतर सेवा अधिक नियमित आणि सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इलेक्ट्रिक बसचा अनुभव ठरला धडा
मागील पाच वर्षांत पर्यावरणपूरक धोरणाचा भाग म्हणून एनएमएमटीने १०० हून अधिक इलेक्ट्रिक बससेवेत आणल्या होत्या. मात्र, चार्जिंग सुविधांची कमतरता आणि तांत्रिक अडचणींमुळे या बस अनेकदा रस्त्यात बंद पडत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत होत्या. ऐनवेळी सेवा खंडित होत असल्याने प्रवासी नाराज होते. या पार्श्वभूमीवर अधिक व्यवहार्य पर्याय म्हणून सीएनजी बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला. वर्षभरापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १५० सीएनजी बस टप्प्याटप्प्याने ताफ्यात सामील केल्या जाणार आहेत.
विस्तारित सेवा क्षेत्रासाठी मदत
एनएमएमटीकडून नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, पनवेल, उरण आणि खोपोलीपर्यंत प्रवासी सेवा दिली जाते. वाढत्या मार्गसंख्या आणि प्रवासी मागणी लक्षात घेता नव्या बसमुळे सेवा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नव्या सीएनजी बस दाखल झाल्यानंतर बसफेऱ्यांमध्ये वाढ, प्रतीक्षाकाळ कमी होणे आणि प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.