तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणावर फक्त चर्चा; ठोस कारवाईचा अद्यापही अभाव
बोईसर, ता. २१ (बातमीदार) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर गेल्या काही महिन्यांत अनेकदा बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. औद्योगिक सांडपाणी, हवेत मिसळणारे धोकादायक वायू आणि दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असूनही संबंधित यंत्रणा मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्याचा आरोप करण्यात येत आहे.
प्रदूषणाबाबत वारंवार तक्रारी, आंदोलने आणि माध्यमांतून उघड झालेल्या घटनांनंतरही काही उद्योगांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी सांडपाणी सोडण्याचे प्रकार थांबलेले नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार आहे. दरम्यान, श्वसनाचे विकार, त्वचारोग आणि इतर आरोग्याच्या समस्या वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही प्रदूषण नियंत्रणासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणांकडून केवळ नोटिसा आणि औपचारिक कारवाईवरच समाधान मानले जात असल्याची टीका होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, बातम्या येतात, आश्वासने दिली जातात; पण प्रत्यक्षात काहीच बदल होत नाही. औद्योगिक विकासाच्या नावाखाली पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी तातडीने कठोर आणि प्रभावी कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी ही स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.