संत कक्कया मार्गावर पाणी
धारावी, ता. १ (बातमीदार) : धारावीतील संत कक्कया मार्गावरील दगडी बिल्डिंगसमोरील रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेच्या भूमिगत जलवाहिनीला गळती लागली आहे. या गळतीमुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असून रस्त्यावर सतत पाणी वाहत आहे.
हा रस्ता वर्दळीचा असल्याने येथे वाहनांची व पादचाऱ्यांची मोठी ये-जा असते; मात्र रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे पादचाऱ्यांना त्यातून वाट काढत चालावे लागत असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पाण्यातून जाताना दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनाही घडत आहेत. वाहनचालकांना वाहन पुढे नेताना अडचणी येत असून पादचाऱ्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग, अंध व्यक्ती, शालेय विद्यार्थी आणि रुग्ण यांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने गळती दुरुस्त करून पाणी वाया जाणे थांबवावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. तसेच गळती दुरुस्तीनंतर रस्ता त्वरित दुरुस्त करून बुजवण्यात यावा, अन्यथा येथे अनधिकृत नळ जोडण्याची शक्यता असल्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.