चरईतील रहिवाशांना हुसकावण्याचा डाव?
आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावले
ठाणे, ता. २८ : जुन्या चरई भागात विकसकांकडून सर्वसामान्य रहिवाशांना दमदाटी करून घराबाहेर काढण्याचे प्रकार समोर आले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत भाजप आमदार संजय केळकर यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना कडक शब्दांत खडसावले असून, रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत.
खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या कार्यक्रमात चरईतील रहिवाशांनी आपली व्यथा मांडली. काही विकसक अधिकाऱ्यांना हाताशी धरून जुन्या इमारतींना हेतुपुरस्सर ‘धोकादायक’ घोषित करत आहेत. रहिवासी आणि विकसक यांच्यात कोणताही कायदेशीर करार झालेला नसताना घरे खाली करण्यासाठी दबाव आणला जात आहे, असे रहिवाशांनी तक्रारीत नमूद केले. यावर केळकर यांनी स्पष्ट केले, की जोपर्यंत रहिवाशांच्या हिताचा करार होत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही सक्ती करू नये.
शाळांची लूट
कार्यक्रमात एका सीबीएसई शाळेतील पालकांनीही गाऱ्हाणे मांडले. शाळा समितीचे निर्णय डावलून विविध उपक्रमांच्या नावाखाली अवाढव्य शुल्क आकारून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. याप्रकरणी केळकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित शाळेची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच, प्रकल्पबाधित रहिवाशांना रेंटल घरांतून बाहेर काढण्याच्या नोटिशींविरुद्ध आता जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘सापत्न’ वागणुकीवरून तंबी
मालमत्ता कर वसुलीसाठी सर्वसामान्यांचे नळजोडणी तोडणे किंवा घरे सील करणे, अशा कारवाया केल्या जात आहेत, तर दुसरीकडे कोट्यवधींची थकबाकी असलेल्या मोठ्या विकसकांना अभय दिले जात आहे. ‘सामान्य नागरिक कर भरण्यास तयार आहेत; परंतु प्रशासनाने त्यांना सापत्न वागणूक देऊ नये,’ अशी तंबी केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.