डोंबिवलीत ‘रामायण’चा जागतिक प्रवास उलगडला
डॉ. धनश्री साने यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान; ‘विश्वात्मक श्रीराम’ विषयावर गुंफले शब्दपुष्प
डोंबिवली, ता. ३० : महर्षी वाल्मीक लिखित रामायण केवळ भारतापुरते मर्यादित न राहता सातासमुद्रापार कसे पोहोचले आणि जागतिक संस्कृतीचा आधारस्तंभ कसे बनले, याचा रसाळ प्रवास ज्येष्ठ अभ्यासक डॉ. धनश्री साने यांनी डोंबिवलीकरांसमोर उलगडला. चैतन्यप्रभा मंडळातर्फे आयोजित समर्थ व्याख्यानमालेत ‘विश्वात्मक श्रीराम’ या विषयावर त्या बोलत होत्या.
डॉ. साने यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले, की अभिजात वाङ्मय आणि लोकपरंपरेत रामायण शतकानुशतके जिवंत आहे. महर्षी वाल्मीक यांनी उभे केलेले श्रीरामांचे उत्तुंग चारित्र्य जागतिक स्तरावर आदराचे स्थान मिळवून आहे. रामकथेचा प्रभाव नेपाळ, ब्रह्मदेश, जावा-सुमात्रा, मलेशिया, कंबोडिया ते थायलंडपर्यंत पसरला असून, चिनी आणि जपानी साहित्यातही रामायणाचे संदर्भ आढळतात, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाची सुरुवात स्मिता तळेकर आणि मेघना कुलकर्णी यांच्या रामरक्षा स्तोत्र पठणाने झाली. सूत्रसंचालन मीना गोडखिंडी यांनी केले, तर प्राध्यापक सुगंधा केसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या व्याख्यानाला डोंबिवलीतील श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.
रामायणाच्या विविध परंपरा
महर्षी वाल्मीक यांच्या रामायणाच्या अधिष्ठानावर आधारित इतर अनेक रामायणांचा आढावा डॉ. साने यांनी घेतला. शिव, हनुमंत, अध्यात्म, आनंद, अद्भुत आणि भावार्थ रामायण अशा विविध परंपरांनी रामकथा समृद्ध केली आहे. मोल्ल, आसामी आणि गोंड रामायणांसारख्या लोकसंस्कृतीतील रूपांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. स्वरूपे कितीही भिन्न असली तरी श्रीरामावरील श्रद्धा सर्वत्र समान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.