पाम बीच अपघाताप्रकरणी कॅण्डल मार्च
नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : पाम बीच मार्गावर भीषण हिट ॲण्ड रन अपघातात प्रशांत जमदाडे आणि हरमन कौर या दोघांचा बळी गेल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ३०) सायंकाळी वाशीतील शिवाजी चौक येथे मृतांच्या कुटुंबीयांनी, मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी कॅण्डल मार्च काढला होता. हातात फलक आणि मेणबत्त्या घेऊन जमलेल्या अनेक तरुणांनी जस्टीस फॉर प्रशांत ॲण्ड हरमन अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या मार्चमध्ये सहभागी झालेले समाजसेवक के. कुमार यांनी हे सहभागी झाले होते. या वेळी प्रशांत जमदाडे याचे वडील विजय जमदाडे यांनी माझा प्रशांत घराचा एकमेव आधार होता. या बिल्डरच्या मुलांनी माझ्या मुलाला आणि हरमनला त्यांच्या गाडीखाली चिरडून मारले आणि मदतीसाठी न थांबता पळून गेले. आम्हाला लवकर न्याय मिळाला नाही, तर मी कुटुंबासह आत्महत्या करेन, असा इशारा दिला आहे.
या प्रकरणाचा तपास सानपाडा पोलिसांकडून काढून मुंबई क्राइम ब्रांच किंवा सीआयडीकडे वर्ग करावा. या प्रकरणात अपघाताच्या कलमांऐवजी आरोपींवर कलम १०५ (हत्या) अंतर्गत गुन्हा चालवावा. पीडित कुटुंबीयांना पोलिस तपासाची सर्व कागदपत्रे आणि सीसीटीव्ही फुटेज दाखवावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.