नवी मुंबईत मनपातील कंत्राटी कामगारांचे भवितव्य महासभेत ठरणार
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकेतील सुमारे १० हजार कंत्राटी कामगारांच्या कार्यरत आहेत. या कामगारांच्या भवितव्याचा आज होणाऱ्या विशेष महासभेत महत्त्वाचा ठराव मांडला जाणार आहे. सभागृह नेते सागर नाईक यांनी हा प्रस्ताव पुढाकाराने आणला असून, यामुळे कामगारांच्या वेतनात वाढ आणि नोकरीच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, उद्यान, विद्युत विभाग, महामार्ग स्वच्छता तसेच विष्णुदास भावे नाट्यगृह यांसारख्या विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या कामगारांना सरासरी २२ हजार रुपये वेतन दिले जाते. मात्र, विविध कपातीनंतर आणि महिन्याचे पूर्ण २६ दिवस काम केल्यानंतर त्यांच्या हाती सुमारे १८ हजार रुपयांपर्यंतच वेतन उरते. या अल्प उत्पन्नामुळे त्यांना संपूर्ण महिना काटकसर करून जगावे लागते, तर अनेकांना अतिरिक्त रोजगार शोधण्याची वेळ येते. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी श्रमिक सेना संघटनेने वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे कामगारांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्यानंतर या विषयाला गती मिळाली असून सागर नाईक यांनी हा मुद्दा महासभेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या १० डिसेंबर २०२५ च्या आदेशाचा संदर्भ देत, दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन, पदसंख्या पुनर्रचना, मंजूर पदांवर अंमलबजावणी, तसेच आवश्यकतेनुसार पदसंख्या वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. याशिवाय अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामानुरूप अंतरिम वेतनश्रेणी लागू करण्याचीही तरतूद प्रस्तावात करण्यात आली आहे. या प्रस्तावाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळून तो एकमताने मंजूर होईल, अशी अपेक्षा कंत्राटी कामगारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या महासभेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, कामगारांच्या भविष्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.