परिवहनचे आर्थिक गणित बिघडले
महसुली उत्पन्नात ४० कोटी रुपयांचा घाटा
भाईंदर, ता. १ (बातमीदार) : आधीच तोट्यात असलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेचे आर्थिक गणित चालू आर्थिक वर्षात आणखी बिघडले आहे. या सेवेतून अपेक्षित असलेले उत्पन्न प्रत्यक्षात न मिळाल्याने तब्बल ४० कोटी रुपयांची तूट महापालिकेला सहन करावी लागली आहे. यात प्रामुख्याने देखभाल-दुरुस्तीअभावी बंद असलेल्या बसमुळे तिकिटाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर प्रशासनाला पाणी सोडावे लागले आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पासोबत परिवहन सेवेचा अर्थसंकल्पही गेल्या आठवड्यात महासभेपुढे सादर झाला. त्यात परिवहन सेवेला २०२५-२६ या आर्थिक वर्षात १०३ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र वर्षअखेरीस केवळ ६२ कोटी रुपयांच्या उत्पन्नावरच प्रशासनाला समाधान मानावे लागले आहे. या तुटीला प्रामुख्याने टिकिटाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात झालेली घट कारणीभूत ठरली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा कंत्राटदारांच्या माध्यमातून चालवली जाते. परिवहनच्या ताफ्यात एकंदर १३१ बस असून, त्यात ७४ बस डिझेलवर चालणाऱ्या आहेत. परंतु कंत्राटदाराकडून डिझेलवर चालणाऱ्या बसची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने जवळपास निम्या बस नादुरुस्त अवस्थेत आगारातच उभ्या होत्या. त्याचा थेट फटका बस टिकिटाद्वारे मिळणाऱ्या महासुलावर झाला. प्रशासनाने सादर केलेल्या सुधारित अर्थसंकल्पातील आकडेवारीनुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तिकीट विक्रीतून ४८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे अपेक्षित धरण्यात आले होते. परंतु मार्चअखेर हा आकडा गाठणे शक्य झालेले नाही. तिकीट विक्रीद्वारे ३२ कोटी ५० लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत. देखभाल-दुरुस्तीअभावी बस नादुरुस्त असल्याने त्या रस्त्यावर धावू शकल्या नाहीत. परिणामी तिकीट विक्री घटून सुमारे १६ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
--------
दुसरीकडे केंद्र सरकारच्या पीएमई बससेवा योजनेद्वारे महापालिकेला १०० बस मंजूर झाल्या आहेत. या बस चालू आर्थिक वर्षात ताफ्यात सामील होऊन त्याद्वारेदेखील उत्पन्न वाढेल, असे प्रशासनाने गृहीत धरले होते. मात्र या बस महापालिकेला अद्याप मिळाल्या नसल्यामुळे या सेवेतून मिळणारे अपेक्षित उत्पन्नही महापालिकेला प्राप्त झालेले नाही.