वज्रेश्वरी, ता. ९ (बातमीदार) : कावळे येथे विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे स्थानिक शेती व जलसंधारणाला मोठी चालना मिळणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट, रोटरी क्लब ऑफ ब्रिजपोर्ट (यूएसए), रोटरी क्लब ऑफ बॉम्बे महाकाली हाइट्स अंधेरी, इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट, रुस्तूमजी ग्रुप, वाडा वीर; तसेच उजागर सेवार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीाल पाहुण्यांचे आदिवासी सांबळ वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी सरस्वती माता व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप हडबाळ यांनी केले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या अध्यक्षा प्रज्ञा मेहता; तसेच ‘चेक डॅम’ प्रकल्पाचे संचालक राहुल पटेल यांनी बंधाऱ्याचे महत्त्व अधोरेखित करत जलसंधारणाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे महाकाली हाइट्स अंधेरीचे उपाध्यक्ष सुनील आनंद यांनीही मार्गदर्शन करत ग्रामीण विकासात अशा प्रकल्पांची गरज स्पष्ट केली. इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट व रुस्तूमजी ग्रुपच्या प्रतिनिधींनी बंधाऱ्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांनी नदीपात्रात श्रीफळ फोडून भूमिपूजन केले. संदीप भोये, सूरज भुसारा आणि प्रतीक पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पठारे यांनी केले.
हरित वातावरण
बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी साठवले जाऊन शेतीसाठी आवश्यक सिंचनाची सोय उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पिके घेणे शक्य होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. तसेच मृदा धूप रोखण्यास मदत होते. जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता वाढून परिसरात हरित वातावरण निर्माण होण्यासही हातभार लागतो.