बदलत्या हवामानाची अवकृपा
जांभळाची आवक कमी होण्याची भीती
विरार, ता. २१ (बातमीदार) ः वसईच्या नगदी फळपिकांमधील जांभूळ पिकाला बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मोहोर गळून किंवा करपल्याने जांभूळ उत्पादक चिंतित आहेत.
वसईचे जांभूळ पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक हातभार लावणारे पीक आहे. उत्पादन काळात ८०० ते १,२०० असा भाव मिळतो. तर एका झाडापासून सर्वसाधारण ५० ते ८० टिपे उत्पादन मिळते. त्यामुळे ४० ते ८० हजारांचे उत्पन्न जांभळांतून मिळत असल्याने आर्थिक हातभार लागतो; मात्र काही वर्षांपासून हवामानातील होणारे बदल जांभळाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम करत आहे.
--------------------------
हंगाम लांबणीवर
बदलत्या हवामानामुळे जांभळाचा हंगाम पावसापर्यंत लांबत गेला आहे. फळांवर पाऊस पडला की त्यांची चव, रंग, दर्जा घसरतो. यामुळे भरपूर फळे देणारे पीक वाया जाते.