पूरग्रस्त क्षेत्रांवर करडी नजर
नालेसफाईच्या कामांची महापौरांकडून पाहणी
विरार, ता. २४ (बातमीदार) ः वसई-विरारमधील सखल भागांना पुराच्या तडाख्याची धास्ती लक्षात घेऊन पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. याच अनुषंगाने शहरातील संवेदनशील तसेच पूरग्रस्त क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाची महापौर अजीव पाटील यांनी पाहणी केली. या वेळी नालेसफाईच्या कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेणार नसल्याचे त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले.
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील एव्हरशाईन सिटीची भौगोलिक स्थिती सखल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो. तुंगारेश्वरच्या डोंगरातून येणारा पाण्याचा प्रचंड लोंढा एव्हरशाईनमार्गे मधुबन, पुढे नायगाव खाडीत मिसळतो. २००५च्या महापुरात येथे सहा ते सात फुटांपर्यंत पाणी साचले होते. याच पार्श्वभूमीवर माजी महापौर रुपेश जाधव यांनी तातडीने नालेसफाई करण्याची मागणी केली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेत महापौर अजीव पाटील यांनी परिसराचा सविस्तर दौरा केला. या वेळी नाल्यांच्या तळाशी असलेला गाळ, कचरा पूर्णपणे काढला जावा, अशा सूचना त्यांनी उपस्थित अभियंता, स्वच्छता निरीक्षकांना दिल्या.