मसाल्यांना यंदा महागाईचा ठसका
पावसामुळे उत्पादनावर परिणाम; आर्थिक नियोजन कोलमडणार
विरार, ता. २४ (बातमीदार) ः पावसाचा मिरचीसह इतर मसाल्याच्या पदार्थांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मसाल्याचे भाव वाढल्याने महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.
ठाणे, पालघर जिल्ह्यात घरचा मसाला बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याचे जिन्नस खरेदी करून उन्हात वाळवले जातात. भाजणीसारख्या प्रक्रिया करून दळून आणलेल्या मसाल्याची साठवण केला जाते. वसई तालुक्यातील ग्रामीण भागात मसाला पदार्थ वाळवण्याची तसेच मसाला कुटण्याची लगबग सुरू आहे; पण लांबलेल्या पावसाचा फटका मसाला पदार्थांवर पडला असून भाव वधारल्याने महागाईची झळ सर्वसामान्यांना बसू लागली आहे. खडा किंवा गरम मसाल्याच्या भावात सध्या मोठी तेजी आली आहे. तसेच जीरे, धणे, जायपत्री, लवंग यांच्या पुरवठ्यात अडथळे आल्याने टंचाई आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मसाले उत्पादनालाही बसला आहे. परिणामी, लग्नसराई, सणावारालाच मसाल्याच्या किमतीत भाववाढ झाल्याचे चित्र आहे.
---------------------------------
भाववाढीचा अंदाज
उन्हाळ्यामध्ये मसाला व इतर पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते; परंतु मागणी असूनही आवक घटल्यामुळे भाव वाढल्याचे चित्र आहे. यंदा लांबलेला पाऊस, किडींमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे; पण भाव आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.
-----------------------
लांबलेल्या पावसामुळे मसाल्याशी निगडित उत्पादनांची आवक कमी आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या मसाला पदार्थांचे भाव वाढले आहेत. काही महिन्यांत मिरचीच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
- हृदयनाथ पाटील, दुकानदार
---------------------
पावसाळ्याचे चार महिने शेतीकामासाठी व्यस्त असतो, त्यामुळे कडधान्य, डाळी, सुकी मासळी, कांदे असा मीठमसाला साठवून ठेवावा लागतो; मात्र यंदा मिरचीसह इतर साहित्याचे भाव वाढले आहेत.
- देविका बाबर, गृहिणी
===========================================
प्रतिकिलोचे दर
प्रकार अगोदर आता
धणे १३० १५०
शहाजिरा १,००० १,१००
जायपत्री २,१०० २,२००
दगडफूल ७०० ८००
चक्रीफूल ८०० १,०००
वेलची ३,२०० ३,५००
लवंग ८५० १,०००