बळीराजाला उष्णतेचा तडाखा
स्वयंचलित हवामान केंद्र बंद असल्याने गैरसोय
वाणगाव, ता. ६ (बातमीदार) : पालघरमधील स्वयंचलित हवामान केंद्र दर १५ मिनिटांनी चक्रीवादळ, अवकाळी पाऊस तसेच उष्णतेच्या लाटेत शेतकऱ्यांसाठी सुरक्षाकवच ठरले होते. मात्र मार्च २०२६ पासून निधीअभावी केंद्र बंद झाल्याने हवामानाच्या अचूक माहितीअभावी शेतकरी हवालदिल आहेत.
पालघर जिल्ह्यात उष्णतेचा कडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळीच कडक उन्हामुळे रस्ते ओस पडलेले दिसतात. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील पाच दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे लहान मुले, वृद्ध आणि कामगारवर्ग विशेष त्रस्त झाला आहे. तर कोणत्याच स्वरूपात हवामान अंदाज मिळत नसल्याने शेती व्यवस्थापनात विविध अडचणी उद्भवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान केंद्र पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
----------------------
शेतकऱ्यांचा मार्गदर्शक हरपला
पालघर जिल्ह्यातील कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रांतर्गत चालणारे हवामान केंद्र गेल्या पाच वर्षांत जिल्ह्याची जीवनवाहिनी ठरले होते. या केंद्रामार्फत तालुकानिहाय हवामान, पावसाची स्थिती, वाऱ्याचा वेग, वीज कोसळण्याच्या शक्यतेनुसार पालघरमधील ८५० गावांतील जवळपास ३० ते ४० हजार शेतकऱ्यांना पिकांच्या नियोजनाची माहिती मिळत होती.
----------------------
पिकांना फटका
वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका शेतकरीवर्गाला बसत आहे. भाजीपाला, फळबागा, पशुधन आणि रोपवाटिका यांवर उष्णतेचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. विशेषतः चिकू, आंबा, भाजीपाला पिकांसाठी पाण्याची गरज वाढली असून, सिंचनाचा खर्चही वाढत आहे. जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असल्याने पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
------------------------------
कृषि विज्ञान केंद्र कोसबाड येथील स्वयंचलित हवामान केंद्र पुन्हा सुरू झाल्यास तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग यासंबंधी अचूक माहिती मिळू शकते. त्यामुळे पिकांना पाणी देण्याची वेळ, खत व्यवस्थापन, कीडनियंत्रण याबाबत योग्य निर्णय घेणे सुलभ होईल.
- चंद्रकांत पाटील, शेतकरी, डहाणू
---------------------
हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना हवामानावर आधारित कृषी सल्ला वेळेत देता येतो. त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होऊन नुकसान टाळता येते. वाढत्या उष्णतेमुळे आगामी काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान केंद्र पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे.
- डॉ. विलास जाधव, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.