शहराचे मलमूत्र थेट खाडीपात्रात
खारलपाडा-गायतारा परिसरात विसर्गाचा प्रकार
पालघर, ता.१ ः शहरातील संकलित मलमूत्र खारलपाडातील गटारात सोडल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आणला आहे. या प्रकारामुळे सातपाटी-मुरबे खाडीला जलप्रदूषणाचा धोका वाढला आहे.
पालघर नगरपरिषद क्षेत्रातील विविध भागांतून टँकरद्वारे मैला संकलित केला जातो. दररोज टँकरच्या चार ते पाच फेऱ्यांमधून दहा हजार लिटर दूषित सांडपाणी गोळा केले जात आहे. खारेलपाडा परिसरात हे पाणी सोडले जात होते. २९ ऑगस्टला टँकरचा पाठलाग करून हा प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणी ग्रामस्थांनी पालघर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तसेच पावसाळ्यात मैला उचलू नये, अशा सूचना असतानाही नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केले आहे. तर नव्याने मल गाळ प्रक्रिया केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी सांगितले.
------------------------------
भूगगर्भात प्रदूषण
- खारलपाड्यात कचऱ्यामुळे आधीच दुर्गंधीचे साम्राज्य आहे. त्यात मलमूत्रयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थांच्या कूपनलिकांच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही चिंता व्यक्त केली आहे.
- नगर परिषदेने २०१६ मध्ये उभारलेले मल गाळ प्रक्रिया केंद्र खोलगट भागात असल्याने पूर्णक्षमतेने कार्यरत नाही.त्यामुळे सांडपाणी जमिनीत मुरत असल्याने भूगर्भजल प्रदूषणाची शक्यता आहे.