नवी मुंबई - नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्यापपर्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत धरणात ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा समाधानकारक नसल्याने येत्या काही दिवसांत पावसाने ओढ दिल्यास पुन्हा ऑगस्टपासून पाणीकपातीचे संकट नवी मुंबईकरांवर ओढवण्याची शक्यता आहे.
महापालिका प्रशासनाने १ जुलैपासून ३० सप्टेंबरपर्यंत दर मंगळवारी १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला. पाणी कपातीमुळे ऐरोली, घणसोलीमध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या विभागात काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने, नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही नागरिक बेकायदेशीर पंप बसवून पाणी घेत असल्याने त्याचा परिणाम वितरणावर होत आहे.
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणी साठविण्याची एकूण क्षमता ही ८८ मीटर आहे. मागील वर्षी २४ जुलै रोजी धरण भरून वाहत होते. मात्र, यंदा २२ जुलैला धरणात सध्या ७९.१२ मीटरपर्यंत पाण्याची पातळी आहे. मोरबे धरणात सद्यस्थितीत ११२.८४६ दक्षलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. अद्यापपर्यंत धरण भागात १४९०.६० मिमी इतका पाऊस झाला आहे. जर धरण क्षेत्रामध्ये जास्त पाऊस न झाल्यास पाणी कपात वाढवण्यात येईल. धरणात आता ५९ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.