मिरज : येथील जुने बस स्थानक ते रेल्वे स्थानक रस्त्यावर महापालिकेकडून केवळ खाबूगिरीसाठी गटारीचे बांधकाम सुरू करून अर्धवट सोडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या खाबूगिरीमुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या हजारो पादचाऱ्यांसह येथील शेकडो व्यावसायिकांचे जीवित धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांसह व्यावसायिकांनी स्वखर्चाने मुरूम टाकून ही गटार बुजवण्यात सुरवात केल्यानंतर आयुक्त नितीन कापडणीस यांनी ठेकेदार, बांधकामच्या अभियंत्यांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या या बोगसगिरी विरोधात नागरिक महापालिकेविरुद्ध न्यायालयात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
कोट्यवधी रुपये खर्चून ट्रिमीक्स पद्धतीने सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता करण्याच्या वावड्या उठवून हे गटारीचे काम सुरू करण्यात आले. ज्या गटारीचे बांधकाम घाईगडबडीत सुरू करण्यात आले त्या गटारीतील पाण्याच्या निचऱ्याचीच व्यवस्था केली नसल्याचीही माहिती स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे या बांधकामासाठी होणारा सर्व खर्च खऱ्या अर्थाने गटारीत जाणार असल्याचाही नागरिकांचा आरोप आहे. स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांनी वारंवार विचारणा करुनही महापालिकेतील कारभारी अधिकारी उत्तर देण्यास तयार नाही. या ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीची व्यवस्था अत्याधुनिक तंत्राने यापेक्षा कमी खर्चात करता येणे शक्य आहे, असेही स्थानिक जाणकारांचे मत आहे.
या गटारीच्या मार्गात झाडाची मोठी मुळे, सांडपाण्याच्या वाहिन्या, पिण्याच्या पाण्याच्या नव्या जोडण्या तशाच ठेवून ठेकेदाराने गटारीतील कॉंक्रिटचे काम कसेबसे उरकले आहे. त्यामुळे सध्या या सिमेंट कॉंक्रिटच्या नाल्यात सांडपाणी साठून प्रचंड दुर्गंधी पसरल्याने स्थानिक नागरिकांनी स्वखर्चाने ही गटार मुरूम टाकून मुजवण्यास सुरवात केली. ठेकेदार कामाकडे फिरकायला तयार नाही. महापालिकेचे अधिकारी काहीही बोलत नाहीत त्यामुळे कामाचे नेमके भवितव्य काय किंबहुना यासाठी झालेला आणि होणारा खर्च हा नागरिकांच्या खिशातून होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी महापालिकेविरुद्ध न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे स्थानक रस्त्यावरील या कामाबाबत तक्रारी मिळाल्यानंतर संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारासह महापालिकेच्या शहर अभियंता आणि नगर अभियंत्यांना दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काम निर्धारित वेळेत पूर्ण झाले नाही तर हे तिघेही दंडात्मक कारवाईस पात्र ठरतील.
- नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका
निव्वळ खाबूगिरीच्या उद्देशाने करण्यात येणारे हे काम म्हणजे नागरिकांच्या पैशाचा अपहार आहे. महापालिकेतील अधिकारी पदाधिकाऱ्यांचे हे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्याय दिसत नाही.
- ऍड. अमित शिंदे, सागंली जिल्हा सुधार समिती
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.