तासगाव (सांगली) : तासगाव तालुक्यातील द्राक्षाचे झारखंडला जाणारे आणि यवतमाळ वर्धाच्या सीमेवर 22 तास अडकून पडलेले तब्बल 25 ते 30 ट्रक राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन केल्यानंतर पुढे मार्गस्थ झाल्या. यासाठी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांनी गृहमंत्री देशमुख यांना फोन केला होता. पुढे राज्याच्या सीमेपर्यंत त्यांची अडवणूक होणार नाही याची सोय त्यांनी करून दिली.
तासगाव तालुक्यातील सावळज परिसरातील द्राक्ष शेतकऱ्यांची द्राक्षे जुगनु फ्रुट कंपनी आणि अन्य व्यापर्यानी खरेदी करून रांची - झारखंड येथील शकिर अहमद या व्यापाऱ्याला पाठवली होती. हे द्राक्षांचे 25 ते 30 ट्रक सांगली जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन एका पाठोपाठ बाहेर पडले. काल हे ट्रक यवतमाळ वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर कोंदलगाव येथे पोलिसांनी लॉकडाऊन चे कारण सांगत 14 तारखेपर्यंत जाता येणार नाही म्हणून अडवून ठेवले.
विनंत्या करूनही हे ट्रक सोडत नाहीत म्हटल्यावर सावळज मधील शेतकरी आणि व्यापार्यानी आमदार सुमनताई पाटील,राष्ट्रवादी चे प्रदेश सचिव ताजुददिन तांबोळी यांच्या संपर्क साधला. आमदार श्रीमती पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधून ही द्राक्षे असल्याने आणि ती खराब होण्याची शक्यता असल्याने अडकलेले ट्रक सोडण्याची विनंती केली.
गृहमंत्री देशमुख यांनी शेतमाल वाहतूक अडवली जाणार नाही असे सांगून अवघ्या अर्ध्या तासात हे सर्व ट्रक पुढे रवाना करण्याची व्यवस्था केली. द्राक्षे पुढे गेली नसती तर साहजिकच भागातील शेतकऱ्यांच्या पैशाची अडचण झाली असती . कमीत कमी दीड कोटींची ही द्राक्षे होती. मात्र 22 तासानंतर का होईना द्राक्षे पुढे मार्गस्थ झाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. आज आमदार सुमन पाटील आणि ताजुददिन तांबोळी यांचे आवर्जून या व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आभार मानले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.