राशिवडे ः ग्रामीण युवक नोकरीच्या मागे न लागता शेतात विविध प्रकाराने काबाडकष्ट करून उत्पन्नाचा मार्ग शोधत असताना लॉकडाउनमुळे ऐन भरात आलेली पिके कवडीमोल दराने विकली जात आहेत. पुंगाव (ता. राधानगरी) येथील प्रवीण रामचंद्र कोरजकर या शेतकऱ्यालाही याचा फटका बसला.
हातातोंडाशी आलेले पीक कुठे खपवायचे या विचारात ते आहेत. कोरजकर यांनी 22 गुंठ्यांमध्ये दहा फेब्रुवारीत सितारा गोल्ड या हिरव्या मिरचीची तीन हजार रोपे लावली. दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण बाग बहरून गेली. या सर्व कामासाठी त्यांना लाख सव्वा लाखापर्यंत खर्च आला. पहिला तोडा करणार तेवढ्यात कोरोनामुळे लॉकडाउन झाले आणि बाजारपेठ बंद झाली.
लॉकडाउन सुरू झाल्यावर पहिला तोडा त्यांच्या एक टन झाला, पण एवढा माल कुठे आणि कसा न्यायचा, गावगावांच्या वेशी बंद, जिल्हाबंदी माल कुठे आणि कसा न्यायचा याच्या विचारात ते आहेत. मग गावागावांत जाऊन किरकोळ व्यापाऱ्यांना अगदी दहा-पंधरा रुपये किलो दराने त्यांनी मिरचीची विक्री केली. गावात दवंडीही दिली. यातून मजुरीही निघाली नाही. पुढच्या नुकसानीचा विचार करून त्यांनी औषध फवारणी थांबवली आहे. एक दिवसआड तोडा करून किरकोळ बाजारात कवडीमोल किमतीत मिरची विकली जाते.
शेतकऱ्यांना धीर द्यावा
लॉकडाउन नसते तर ही मिरचीची बाग ऑगष्टपर्यंत चालली असती आणि दहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले असते. शासनाने नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना धीर द्यावा.
प्रवीण रामचंद्र कोरजकर
शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
एकीकडे शासन मोठमोठ्या उद्योगपतींना, व्यापाऱ्यांनी, कर्जबुडव्यांना मदत करत आहे, मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. त्यांनी अशा शेतकऱ्यांचा सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना भरपाई दिली पाहिजे.
- पांडुरंग भांदिगरे, सदस्य, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.