कोल्हापूर: शहरालगतची १४ गावे नेहमीच तहानलेली असतात. गांधीनगर नळ(Gandhinagar tap water supply scheme)पाणीपुरवठा योजना अपुरी पडत आहे. जलवाहिनी फुटणे, वीज खंडित होणे, उपसा केंद्रात बिघाड होणे, या दुष्टचक्रात ही योजना सापडली आहे. नवा पर्याय शोधला नाही, तर लवकरच पाण्याचा दुष्काळसदृश परिस्थिती होणार आहे. १४ गावांची पाणीपुरवठा व्यवस्था आणि सद्यस्थिती याचा आढावा घेणारी मालिका आजपासून.(fourteen-village-water-scheme-in-danger-kolhapur-marathi-news)
शहरालगतच्या १४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजनेची क्षमता संपू लागली आहे. रोज ४० ते ५० लाख लिटरची मागणी आणि पुरवठा केवळ १० लाख लिटर, अशी योजनेची अवस्था झाली आहे. समाविष्ट असणाऱ्या उचगाव, पाचगाव, गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड, मुडशिंगी, उजळाईवाडी या गावांना आठवड्यातून केवळ दोनच दिवस पाणीपुरवठा होतो. वारंवार गळती, विद्युत खंडित होणे, या कारणाने अडचणीत वाढ होत आहे. योजनेच्या देखभालीचा वाढता खर्च, पाणीपुरवठ्याची वाढलेली मागणी आणि वाढत जाणारी लोकसंख्या पाहिली, तर ही योजना कशीबशी वर्ष-दोन वर्ष चालेल. ही योजना बंद पडली तर या १४ गावांची पाण्यासाठी वणवण होणार आहे.
गांधीनगर, उचगाव, मुडशिंगी, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव या गावांसाठी १९९७ ला २० कोटी खर्चाची ही योजना मंजूर झाली. योजना पूर्ण क्षमतेने सुरू व्हायला २००५ उजाडले. योजना ताब्यात घ्यायला जिल्हा परिषदेने नकार दिल्यामुळे ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे चालवली जाते. गाव पातळीवर पाणी वाटप आणि बिलाची वसुली ग्रामपंचायत करते; पण जीवन प्राधिकरणाकडे कमी पैसे भरल्यामुळे प्राधिकरणाची आठ कोटींची थकबाकी आहे. ही योजना करताना २०३० वर्षांपर्यंत गृहीत धरून या गावांची लोकसंख्या १ लाख ४० हजार होईल, अशी अपेक्षा धरली होती. प्रत्यक्षात २०१५ ला ही लोकसंख्या या गावांनी पार केली. त्यामुळे योजनेवर ताण वाढला. ग्रामीण निकषाप्रमाणे प्रति माणशी ५५ लिटरप्रमाणेच पाणी दिले आहे. बिलाची आकारणी मात्र अधिक आहे.
शहरातील जागा संपल्याने लोकांचा ओढा या गावांत अधिक आहे. या परिसरात दोन लाखांहून अधिक लोकसंख्या वास्तव्यास आहे. या लोकसंख्येला पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. लोकसंख्या वाढल्याने दररोज ४० ते ५० लाख लिटर पाण्याची मागणी आहे. प्रत्यक्षात १० लाख लिटर पाणीपुरवठा होतो. त्यासाठी उपसा केंद्र १६ ऐवजी २४ तास चालू करावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास अथवा पाईपलाईन फुटल्यास पाणीपुरवठ्यात अडथळा येतो. योजनेची क्षमता जर वाढली नाही, तर मात्र एक-दोन वर्षांतच ही योजना बंद पडेल.
समाविष्ट गावे
उचगाव, पाचगाव, गांधीनगर, वळिवडे, निगडेवाडी, चिंचवाड, गडमुडशिंगी, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, कणेरी, कंदलगाव.
दृष्टिक्षेपात योजना
योजना मंजूर - १९९७
खर्च- २० कोटी रुपये
योजना पूर्ण क्षमतेने सुरू - २००५
जीवन प्राधिकरणातर्फे चालवली जाते
प्रतिमाणशी ५५ लिटरप्रमाणेच पाणी
गावपातळीवर पाणी वाटप, बिल वसुली
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.