पश्चिम महाराष्ट्र

पावसाळ्यात विद्यानगर बनतंय जलमय ; सांडपाणी निचऱ्याचाही प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे विद्यानगर सध्या जलमय बनले आहे. विद्यानगरचे नागरीकीकरण वाढत असताना विकासाच्या नियोजनाच्या अभाव नागरिकांच्या मुळावर उठला आहे. सांडपाण्यासह पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या प्रश्‍नासह अपुरी गटारे यामुळे निर्माण होणारे प्रश्‍न नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणे ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. 
कऱ्हाड शहराच्या विस्ताराला मर्यादा असल्याने विद्यानगरचे नागरीकीकरण झपाट्याने वाढले. मात्र, त्या तुलनेत तेथील विकास होत असताना नियोजनाचा अभाव राहिला. सैदापूर हद्दीतील शेतजमिनीचे प्लॉट पडून तेथे इमारती उभ्या राहिल्या. यातील अनेक इमारतींना आज रस्त्यासह गटारे, पथदिव्यांचा प्रश्‍न भेडसावत आहे. तडजोडीने रस्ता घेतला तरी अवघ्या दहा फुटांच्या रस्त्यात एखादी चारचाकी उभी राहिली तरी ती हटवल्याशिवाय दुसरे वाहन जावू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे किती प्लॉटचे "लेआऊट' रस्त्याविनाच असल्याची चर्चा आहे. त्यातूनच प्रत्येकाने हद्दीबरोबर उभारलेल्या इमारती, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नसल्याने इमारतीजवळच खड्डा काढून त्यात सोडलेले ड्रेनेज असे विद्यानगरमध्ये चित्र पाहायला मिळते. अलीकडे काही कॉलनी, सोसायट्यांतील रस्ते डांबरी झाले. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणचे रस्ते शोधण्याची व विशेषतः पावसाळ्यात त्या दलदलीतून बाहेर पडण्याचे दिव्य रहिवाशांना पेलावे लागते. त्यामुळे पावसाळा आला की, तेथील नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहतो. नैसर्गिक ओढे, नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे पावसाचे पाणी निचऱ्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन ते तीन वर्षांपासून पावसाळ्यात विद्यानगर जलमय होताना दिसत आहे. स्थानिकांनी पाण्याच्या निचऱ्याच्या अडवलेल्या वाटा रहिवाशांसह स्थानिकांच्या जिवावर बेतणाऱ्या ठरत आहेत. दोन दिवसांपासून विद्यानगरमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. बनवडी फाट्यापासूनचे पावसाचे पाणी विद्यानगरमध्ये सूर्या हॉटेल, जे. के. पेट्रोलपंपाच्या मागे येऊन ते कऱ्हाड-विटा मार्गावर येते. मात्र, कृष्णा नदी असो अथवा कालव्यात पाणी सोडण्यात असणाऱ्या मानवनिर्मित अडचणींमुळे पावसाचे पाणी रस्त्यावर व परिसरात साचून राहिले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकच ठप्प झाली. वाहनधारकांना पर्यायी रस्त्याचा आधार घ्यावा लागला. मात्र, पावसाच्या पाण्याचा वेढा पडलेल्या घरांतील नागरिकांची मोठी दैना झाली. अनेकांच्या घरातही पाणी शिरले. ज्येष्ठ, लहान मुलांसह नागरिकांचे हाल झाले. दोन वर्षांपूर्वी अशीच स्थिती होवून त्यानंतरही त्यावर उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने त्याबाबतची उदासिनता दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्थेसह स्थानिक व रहिवाशांनी एकत्रितरित्या या प्रश्‍नावर मार्ग काढण्याची गरज असून, त्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT