22 जुलैला पहिली गाडी - मार्चमध्ये ताकारी-शेणोली दुहेरी मार्ग चाचणी
मिरज - कोल्हापूर ते पुणे मार्गावरील विजेवर चालणारी पहिली रेल्वे 22 जुलै रोजी सुरू होणार आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस ही महत्त्वाची गाडी विजेवरील इंजिनद्वारे मुंबईकडे रवाना होईल. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेत नव्या पर्वाचा आरंभ होईल.
दरम्यान, मार्च महिन्यामध्ये मिरज ते शेणोलीपर्यंतच्या दुहेरी मार्गाची पहिली चाचणी घेण्यात येणार आहे. ही दोन उद्दिष्टे समोर ठेऊन रेल्वेचे विद्युत आणि बांधकाम विभाग झपाटून कामाला लागले आहेत. अनेक ठिकाणी रांत्रदिवस काम सुरू आहे. यावर नियंत्रण असणाऱ्या रेल्वेतील अभियंते आणि ठेकेदारांच्या यंत्रणेवर थेट रेल्वे बोर्डाच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विजेवरील रेल्वे आणि मार्गाचे दुहेरीकरण हे विषय चर्चेत होते. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून त्याची मागणी होती. प्रत्यक्षात कोल्हापूर-पुणे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण वर्षभरापूर्वी सुरू झाले. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी स्वतः लक्ष घालून त्यासाठी निधीची तरतूद केली. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी प्राधान्याने ही कामे हाती घेतली. त्याची कालमर्यादा ठरवून काम सुरू करण्यात आले.
या नियोजनास अनुसरून रेल्वेतील विद्युत आणि बांधकाम विभागाच्या यंत्रणा जोमाने कार्यरत आहेत. सध्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्यापासून मिरजपर्यंत सध्याच्या रेल्वेमार्गाकडेला विद्युतवाहिनीच्या खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यावर वायर टाकण्यासाठीचे अँगल बसवले जात आहेत. प्रत्येक स्थानकावरील विद्युत यंत्रणेसह कोल्हापूर आणि मिरज स्थानकावरील विद्युत विभागाचे मोठ्या क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर तसेच अन्य यंत्रणा बसविण्याचे काम मेपर्यंत पूर्ण करण्याचे विद्युत विभागाचे नियोजन आहे. जून आणि जुलै महिन्यात पुणे-कोल्हापूर या सर्व मार्गांवरील विद्युतीकरणाच्या कामाच्या चाचण्यांना सुरवात होईल. त्यानंतर 22 किंवा 23 जुलै रोजी पहिली विजेवरील इंजिनाची रेल्वे कोल्हापूर ते मुंबईपर्यंत धावेल.
दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील भूसंपादनाचे काम बऱ्यापैकी पूर्ण केले आहे. ज्या ठिकाणी भूसंपादन झाले आहे. त्या ठिकाणी खोदाई, भराव, तसेच छोट्या पुलांची कामेही सुरू झाली आहेत. यामध्ये ताकारी, भवानीनगर, ते शेणोली या दरम्यान कोणतेही किचकट काम नसल्याने या ठिकाणचे दुहेरीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आणि याच मार्गावर येत्या मार्च महिन्यात इंजिनची चाचणी घेण्यासाठी बांधकाम विभागाची खटपट सुरू आहे.
लक्ष दिल्लीहून
सध्या या कामाबाबतचा दैनंदिन अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडून थेट दिल्लीला रेल्वे बोर्डास पाठविला जातो. या अहवालात प्रत्येक दिवशी कामात प्रगती दिसली नाही तर त्याचा जाब थेट दिल्लीहून बोर्डाचे अधिकारी त्याच दिवशी संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांना विचारतात. दिल्लीस्थित अधिकाऱ्यांच्या याच नियमित निरीक्षणामुळे ही दोन्ही कामे युद्धपातळीवर सुरू असल्याच्या माहितीस रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.