नागठाणे - खडतर आयुष्य जगणाऱ्या कोयना विभागातील लोकांचे कित्येक वर्षांचे दळणवळणाचे स्वप्न आता साकार होत आहे. रेणोशी अन् कोट्रोशी या गावांदरम्यान कोयना नदीवर कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभ्या राहिलेल्या ‘जीवनसेतू’मुळे हे शक्य झाले आहे. स्थानिकांबरोबरच पर्यटकांसाठीही नवा पूल आकर्षण ठरणार आहे.
कोयना धरणामुळे विस्तृत पाणीसाठा निर्माण झाला आहे, तो शिवसागर जलाशय म्हणून प्रसिद्ध आहे. शिवसागराच्या पलीकडे कोयना अभयारण्यासह अत्यंत निबीड जंगल आहे. येथील लोकांचे जीवन अत्यंत खडतर ठरते. प्रचंड पर्जन्य, दाट जंगल, हिंस्त्र श्वापदांचा वावर ही इथली ठळक वैशिष्ट्ये. अर्थात अलीकडच्या काळात महाबळेश्वरकडून थेट कोकणात जाणारा मार्ग तयार झाला आहे. रघुवीर घाटातून तो खेडमध्ये पोचतो.
त्यामुळे हळूहळू दळणवळणात सुलभता येत आहे. त्यात आता कोट्यवधी रुपये खर्चून उभ्या राहिलेल्या पुलाची भर पडत आहे.
महाबळेश्वरहून तापोळा हा परिसरातील प्रमुख मार्ग. या परिसरात कोट्रोशी, बुर्डाणी, कळमगाव, हरचंदी, वेळापूर, देवळी, पाली, आमशी आदी गावे आहेत. नदीच्या पलीकडील तीरावर रेणोशी, खरोशी, रुळे, आहीर आदी गावे आहेत. येथील लोकांचे जनजीवन या पुलामुळे सुकर होणार आहे. वेळ, अंतर, खर्च यात बचत होणार आहे. जीवनमान उंचावणार आहे. भविष्यात कोकणात उतरण्यासाठी आणखी एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. पुलाचे बहुतांश काम मार्गी लागले आहे. प्रासंगिक स्वूपात वाहतूकही सुरू झाली आहे. लवकरच पुलाचे काम पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
कोकणाला जोडणारा महत्त्वपूर्ण पूल
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण अन् ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाणारे, तापोळा इथे सदैव पर्यटकांचा ओघ सुरूच असतो. तिथून कोयना अभयारण्य तसेच कोकणात जाण्यासाठी हा पूल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळेच भविष्यात या पुलामुळे पर्यटनास चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.