राहुरी: राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील सिंचनासाठी मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आज उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यात आले.
उन्हाची तीव्रता वाढल्याने सिंचनाचे आवर्तन सुरू करण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी होती. धरणात भरपूर पाणी आहे. शेतातील पिके जळू लागली आहेत, तरी आवर्तन सुटत नाही. याविषयी शेतकऱ्यांना कोडे पडले होते. मागील हंगामात आवर्तनापूर्वी मुळा उजव्या कालव्याच्या भरावाची कामे निकृष्ट दर्जाची झाली.
मातीमिश्रित वाळूचा वापर झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी भराव खचले. काही ठिकाणी कालव्याचे गेट तुटले. त्यांची कामे या आवर्तनापूर्वी होणे गरजेचे होते; अन्यथा कालवा फुटण्याचा धोका होता. ही कामे सुरू करण्यास उशीर झाला. त्यामुळे भरावाच्या कामास विलंब लागणार होता.
उजव्या कालव्याचे आवर्तन 25 मार्च रोजी सोडण्याचे नियोजन होते. परंतु शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 20 मार्च रोजी आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे कालव्याची कामे उरकती घेऊन जलसंपदा खात्याला पाच दिवस अगोदर आवर्तन सुरू करणे भाग पडले.
मुळा उजव्या कालव्याची वहनक्षमता 1652 क्यूसेक आहे. आज धरणातून 700 क्यूसेकने आवर्तन सुरू करण्यात आले. उद्या (शनिवारी) दीड हजार क्यूसेकने विसर्ग वाढविला जाईल. राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील 26 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. शेतकऱ्यांनी कालव्यात वीजपंप टाकून अनधिकृतरीत्या पाणीउपसा करू नये यासाठी जलसंपदा खात्याने भरारी पथके तैनात केली आहेत.
कालव्याच्या आसपासचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. कालव्यातून पाणीचोरी रोखण्यासाठी प्रसंगी पोलिस संरक्षण मागण्याची तयारी जलसंपदा खात्याने केली आहे. सिंचनात शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मुळा धरण शाखा अधिकारी अण्णासाहेब आंधळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.