पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र सांगलीकडे, पालकमंत्री सुभाष देशमुख कुणीकडे?

सकाळवृत्तसेवा

सांगली - पोलिसांच्या अमानवी कृतीचा निषेध करायला सबंध महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची सांगलीत रीघ लागली आहे. अतिशय संवेदनशील प्रकरणात पोलिस दलाची नाचक्की झाली आहे. महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. अशावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख मात्र सांगलीकडे फिरकलेले नाहीत. एका संवेदनशील प्रश्‍नावर त्यांनी असंवेदनशीलपणे पाहिले आहे. 

चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेत कोथळे याचा कोठडीत मारहाण करून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळला गेला. तो फरार झाल्याचा बनाव करण्यात आला. या प्रकरणाला आठवडा उलटायला आला. तब्बल १२ पोलिस निलंबित झाले. पोलिस उपाधीक्षकांना सहआरोपी करण्याची मागणी केली जातेय. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पोलिस अधीक्षक आणि विशेष पोलिस महानिरीक्षकांचीही  चौकशी केली जाईल, असे जाहीर केले आहे.

या संवेदनशील आणि राज्य हादरवून सोडणाऱ्या प्रकरणात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, आमदार पतंगराव कदम, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी येथे भेट दिली. सदाभाऊ खोत वगळता सर्वांनी कोथळे कुटुंबीयांची भेट घेतली. यात गृहखात्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच  गृहखात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे हा विषय  अधिकच संवेदनशील आहे. 

या घडामोडी सुरू असताना सहकारमंत्री सुभाष देशमुख सांगलीकडे फिरकलेले नाहीत, हे आश्‍चर्यजनकच आहे. त्यांनी पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळून दीड वर्ष झाले. या काळात त्यांनी जिल्हा प्रशासनावर फारशी पकड घेतली नाही, हे वास्तव आहे. जिल्हा पोलिस, जिल्हा  प्रशासनाला त्यांचा धाक वाटत नाही, हेही अनेक  प्रकरणांत स्पष्ट दिसले आहे. कारण, देशमुख यांना सांगलीसाठी वेळ कुठाय? जी अवस्था महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना होती, त्याहून वेगळे चित्र नाही. ‘तुम्ही महापालिकेच्या प्रश्‍नात लक्ष का घालत नाही?’ या प्रश्‍नावर त्यांनी ‘मला महापौरांनी बोलावलेच नाही’, असे उत्तर दिले होते. आता या प्रकरणात त्यांनी कुणी आमंत्रण देण्याची गरज आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

कर्जमाफीचे कारण
पालकमंत्री सुभाष देशमुख सांगलीला का आले नाहीत? याचा शोध घेताना अत्यंत तकलादू कारणे समोर आली आहे. एक तर सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्‍नात ते अडकलेले आहेत. दुसऱ्या बाजूला सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासोबतच्या राजकीय काटाकाटीतून त्यांना वेळ नाही. त्यांनी अधिकृत कारण देताना ‘कर्जमाफीत अडकलोय’,अशी ढाल केली आहे. कर्जमाफीचे त्रांगडे सुटायला किती काळ लागेल, पत्ता नाही. तोवर ते इकडे फिरकणारच नाहीत का? सांगलीचे वाटोळे झाले, राज्यभर नाचक्की झाली, एकाचा हकनाक बळी गेला तरी पालकमंत्र्यांना वेळ नाही, हेच धक्कादायक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT