सांगली - टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांची वीज जोडण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज महावितरणला दिले. भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी भेट घेतल्यानंतर त्यांनी सूचना दिली. त्यानंतर वीज जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे शनिवार (ता. 19) दुपारपर्यंत या योजनांचे बटन दाबले जाईल. सोमवारनंतर कालव्यात पाणी सुरू होईल. या तिन्ही योजनांची वीज थकबाकी सुमारे 48 कोटी रुपये आहे. त्यामुळे महावितरणने मेमध्ये वीज तोडली होती. दरम्यान, मुंबई आज भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होती. त्याला खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे उपस्थित होते. या साऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. गेल्या आठवड्यात टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू करण्याबाबत आदेश दिले होते; मात्र वीज जोडणी झाली नाही, अशी आठवण देतानाच परिस्थिती गंभीर असल्याचे सर्वांनीच सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ श्री. बावनकुळे यांनी पाचारण केले. त्यांना तातडीने तीनही योजनांची वीज जोडण्याचे आदेश दिले. त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत ठराव व लेखी आदेशाची वाट पाहू नका. मी आदेश काढतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या बैठकीतच श्री. बावनकुळे यांनी पुढे आदेश दिले. हे आदेश प्राप्त होताच दुपारनंतर वीज जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, पाटबंधारे विभागाने शनिवारी दुपारपर्यंत अन्य प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. त्यानंतर बटन दाबले जाईल, असे स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष कालव्यातून पाणी वाहण्यास सोमवार उजाडेल. त्यादिवशीच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आवर्तनाचे वेळापत्रक ठरेल, असे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी सांगितले. तलाव भरण्यास प्राधान्य टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडताना प्राधान्याने जिल्ह्यातील तलाव भरून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी या पट्टयातील द्राक्ष, ऊस, डाळिंब पिकांना पाणी उपसण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडणार आहे. पावसाने अजून ओढ दिली तर योजनेवर ताण येण्याची शक्यता आहे. |