सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणातील पाणीसाठा उणे १.३० टक्क्यावर आला आहे. सध्या भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी सोडलेले भीमा नदीतील पाणी व कालवा, बोगदा आणि उपसा सिंचन योजनांमधून सोडलेल्या विसर्गामुळे धरणातील दररोज दोन टीएमसी पाणी कमी होत आहे.
गतवर्षी पाऊस कमी झाल्याने उजनी धरण ६३ टक्केच भरले होते. त्यामुळे जानेवारीअखेर धरण उणे पातळीत गेले होते. यंदा मात्र, धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने १८ एप्रिल रोजी धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. महापालिकेला गतवर्षी मार्चमध्ये दुबार तर एप्रिलमध्ये तिबार पंपिंग करावे लागले होते. त्यासाठी महापालिकेचा तीन कोटींचा खर्च झाला होता, यंदा मात्र समांतर जलवाहिनीमुळे तशी स्थिती येणार नाही. दरम्यान, उजनीवर पाणीपुरवठ्याच्या ४२ योजना कार्यान्वित आहेत. याशिवाय सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून तर शेतीसाठी कालव्यातून, बोगद्यातून पाणी सोडले आहे.
२५ मेपर्यंत शेतीसाठी सोडलेले पाणी सुरू राहणार आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पिभवनाचा वेग देखील यंदा जास्त आहे. भीमा नदीतील पाणी तीन दिवसांनी बंद झाल्यावर कालवा, बोगद्यातून दररोज अर्धा टीएमसीच पाणी कमी जाणार आहे. शेतीसाठी सोडलेले पाणी बंद केल्यावर पाच दिवसाला एक टीएमसी पाणी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर ३१ मेपर्यंत धरणात ४० टीएमसीपर्यंत पाणी शिल्लक राहणार आहे. त्यानंतर धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव असणार आहे.
‘समांतर‘मुळे महापालिकेचे वाचणार ६५ कोटी
समांतर जलवाहिनीमुळे आता उजनी धरण उणे ८० टक्के झाले तरी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी घेता येणार आहे. याशिवाय ही जलवाहिनी सुरू झाल्यावर दरवर्षी भीमा नदीतून औज, चिंचपूर बंधाऱ्यात तीन-चारवेळा सोडावे पाणी देखील बंद होणार आहे. त्यामुळे प्रत्येक आवर्तनासाठी महापालिकेला द्यावे लागणारे १६ कोटी रुपये देखील वाचणार आहेत. याशिवाय दुबार-तिबार पंपिंग देखील कायमचे बंद झाल्याने दरवर्षीचा दोन-तीन कोटींचा खर्च बचत झाल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले.
उजनी धरणाची सद्य:स्थिती
एकूण पाणीसाठा
६३ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
०००
धरणातील पाणीसाठा
उणे १.३० टक्के
धरणातून सोडलेला विसर्ग
९६०० क्युसेक
जिल्ह्यात माळशिरसमध्ये ५ टॅंकर सुरू
सोलापूर जिल्ह्यातून २५ टॅंकरची मागणी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाली आहे. पण, सध्या माळशिरस तालुक्यात पाणीपुरवठ्यासाठी पाच टॅंकर सुरू केले आहेत. एखाद्या गावाने पाण्याचा टॅंकर मागितल्यास तालुकास्तरावरील तहसीलदार, गटविकास अधिकारी व पाणीपुरवठ्याचे उपभियंता यांच्या समितीकडून त्याची पडताळणी होते. त्या गावाला खरोखर टॅंकरची गरज असेल तरच त्याठिकाणी टॅंकर दिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.