सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. आरोग्य यंत्रणा पुन्हा सज्ज करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी कोरोना चाचण्यांचे अहवाल, विक्रेते, फेरीवाले, व्यापारी यांचे होणारे नुकसान आदींबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. जनभावनेचा विचार आणि कोरोनाचा प्रतिबंध यातील सुवर्णमध्य साधणारा निर्णय असावा अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. आमदार गाडगीळ यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना मागण्यांचे निवेदन आढावा बैठकीवेळी दिले. यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, की लॉकडाऊनबाबत व्यापारी, विक्रेते, फेरीवाले, भाजीपाला व फळ विक्रेते यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. गेली दोन वर्षे महापूर आणि त्यानंतर कोरोनाने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी घेऊन सरकारने त्यांना काही पर्याय किंवा उपाय अथवा मदत तातडीने द्यावी. कोरोना हॉस्पिटल ही उपचाराची केंद्रे व्हावीत, रुग्णांची लूट करणारी केंद्रे होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. उपचाराचा खर्च कमी होण्यासाठी सरकारने गांभीर्याने प्रयत्न करावा.
महालॅब मार्फत कोरोना चाचण्या मोफत केल्या जातात. सांगली व मिरज सिव्हिल महालॅबशी जोडले नसल्याने चाचण्या मोफत होऊ शकत नाहीत. सिव्हिलमध्ये दाखल रुग्णांच्या कोरोना चाचण्या मोफत होण्यासाठी प्रयत्न करावा.
मागण्या अशा
* उपचारात आयएमएची मदत घ्या.
* ग्रामीण भागातही सुविधा वाढवा.
* एम. डी. डॉक्टरांची हॉस्पिटल उपचारासाठी घ्यावेत.
* रेमिडेसिविरचा काळाबाजार रोखून कमी किंमतीत उपलब्ध करून द्या.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.