राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे तीन लाख वारकऱ्यांनी मंगळवारी पहाटेपासूनच इंद्रायणीतीरावर गर्दी केली होती.
आळंदी - कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे पायी वारी सोहळा झाला नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे संकट न येता, विनाअडथळा परंपरेने घराण्यात चालत आलेली वारी घडावी, यासाठी ‘हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी’ असे मनोमन पांडुरंग चरणी प्रार्थना करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इंद्रायणी तीरी लाखो वैष्णवांच्या मेळा जमला होता. राज्यभरातून आलेल्या छोट्या मोठ्या साडेचारशेहून अधिक दिंड्या येथील विविध धर्मशाळा, राहूट्यात गेली चार दिवसांपासून विसावलेल्या होत्या. दिंडीतील वारकऱ्यांची इंद्रायणी घाटावरील रंगणारी भजने आणि टाळ-मृदंगाच्या आवाजाने सारा परिसर भक्तिरसात आकंठ न्हाऊन निघाला.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे तीन लाख वारकऱ्यांनी मंगळवारी पहाटेपासूनच इंद्रायणीतीरावर गर्दी केली होती. कपाळी गंध, बुक्का, हाती वीणा घेऊन वारकरी येत होते.
आळंदीत सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्या दाखल झाल्या. दुपारी दोननंतर देवस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार यांच्या मदतीने महाद्वारातून दिंड्या आत घेण्यास सुरवात झाली आणि प्रत्यक्ष प्रस्थान सोहळा सुरू झाला.
पायी वारीची आस
पालखी सोहळा बुधवारी (ता. २२) सकाळी पुण्याच्या दिशेने पंढरीसाठी मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
वाहनांना बंदी
पुणे-आळंदी रस्त्याने पालखी जाणार असल्याने चारचाकी आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे. दिंडीकऱ्यांची वाहने मरकळ-लोणीकंदमार्गे पुण्याच्या दिशेने वळविणार आहेत. लोहगावमार्गे कळस येथे दिंडीकऱ्यांची काही वाहने सोडली जातील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.