सोमाटणे, ता. ३ : पवनमावळ परिसरात वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. पवनमावळ पूर्व भागांत गुरुवारी (ता. २) दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे कांदा व गहू पूर्ण भिजला. तसेच भाजीपाला, फुलशेती, बाजरी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतीमालाचे संरक्षण करण्यास शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही, त्यामुळे नुकसान अधिक वाढले. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सुभाष धामणकर (उर्से), सुरेश राक्षे (सांगवडे), संजुकुमार बोडके (गहुंजे), हनुमंतराव मुऱ्हे (सोमाटणे), दिलीप राक्षे (साळुंब्रे), बाळासाहेब केदारी (कुसगाव) आदींनी केली आहे.
---