तळेगाव दाभाडे, ता. ३० : गौण खनिज उत्खनन प्रकरणात दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन राज्य सरकारने मागे घेतले आहे. या अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून (ता.३०) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
मावळ तालुक्यातील गौण खनिज उत्खनन प्रकरणात राज्य सरकारने चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. आमदार सुनील शेळके यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रकरणावर लक्षवेधी मांडली होती. त्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दहा अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. यावर पुणे जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या निलंबितांमध्ये तहसीलदार रणजित देसाई, मधुसूदन बर्गे, जोगेंद्र कट्यारे, विक्रम देशमुख; मंडळ अधिकारी : संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे, रमेश कदम आणि ग्राम महसूल अधिकारी : दीपाली सनगर, गजानन सोटपेल्लीवार यांचा समावेश होता.