वडगाव मावळ, ता. १८ : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत अलिबाग पंचायत समितीच्या तालुकास्तरीय मूल्यमापन समितीने नुकतीच मावळ तालुक्यातील २१ गावांची पाहणी करून मूल्यांकन केले.
हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडले असून, यासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका अशा विविध स्तरांवर ग्रामपंचायतींना एकूण १२ प्रकारची पारितोषिके दिली जाणार असून, राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीला ५ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
अलिबाग पंचायत समितीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा मूल्यमापन समितीच्या अध्यक्षा शुभांगी नाखले, समितीचे सदस्य चंद्रशेखर धुमाळ, राजेश घरत, हंसराज कोकार्डे, केतुल पाटील, विनोद पाटील आदींचा समितीमध्ये समावेश होता. त्यांनी मावळ तालुक्यातील इंदोरी, जांभूळ, भोयरे, कान्हे, सुदुंबरे, देवले, सोमाटणे, दारुंब्रे, उर्से, शिरगाव, महागाव, मुंढावरे, वरसोली, कार्ला, नवलाख उंब्रे, माळेगाव बुद्रुक, वाकसई, परंदवडी, धामणे, कुणेनामा आणि करंजगाव या गावांना भेटी दिल्या.
या भेटीदरम्यान सुशासनयुक्त पंचायत, आर्थिकदृष्ट्या सक्षम पंचायत, जलसमृद्ध व स्वच्छ-हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, ग्रामस्तरावरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग व श्रमदानातून उभारलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. मावळ पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी सेवक थोरात, कृषी अधिकारी संताजी जाधव, पशुधनविकास अधिकारी डॉ. कैलास चोलकर, विस्तार अधिकारी अरुण सोळंकी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या पाहणी दौऱ्याचे नियोजन करून गावांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती समितीसमोर मांडली.
---