भोसरी, ता. २० ः दिघी, आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील विक्रेत्यांचे अतिक्रमण, विजेचा लपंडाव, कमी दाबाने पाणी पुरवठा आदी प्रमुख समस्या सोडविण्याचे आवाहन भोसरीतील नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे राहणार आहे. महापालिकेच्या आरक्षित जागा विकसित करण्याचे प्रयत्नही त्यांना करावे लागणार आहे. येत्या पाच वर्षांत या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक कसे पाऊले उचलतात ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक पाचमध्ये भोसरी गावची मुख्य बाजारपेठ असलेल्या आळंदी रस्त्याचा तर नव्याने बाजारपेठेत रुपांतरीत होत असलेल्या दिघी रस्त्याचा समावेश होतो. या रस्त्यावर भाजी, फळे, विक्रोत्यांसह विविध वस्तू विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमणांमुळे या रस्त्यावर नेहमीच होत असलेली वाहतूक कोंडी ही वाहन चालक आणि नागरिकांची नेहमीचीच डोकेदुखी झाली आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर रस्त्यावरील अतिक्रमणांकडे बोट दाखवून भोसरी वाहतूक पोलिस विभाग नेहमीच स्वतःचा बचाव करत आलेला आहे. असे असले तरी या रस्त्यावरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणांवर ठोस उपाय महापालिकेला अद्याप तरी करता आलेला नाही.
या प्रभागात विजेचा लपंडावही नित्याचाच झाला आहे. दररोजच या प्रभागातील गवळीनगर, आदर्शनगर, संभाजीनगरासह इतरही काही भागातील विद्युत पुरवठा दोन-तीन तास खंडित राहतो. या भागात पाणी सुटण्याची दिवशी तर हमखास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांच्या आहेत. त्यामुळे या प्रभागात लोकसंख्येच्या वाढीप्रमाणे नवीन क्षमतेचे विद्युत रोहित्रे बसविण्याबरोबरच जुन्या झालेल्या केबल बदलण्याचे काम येत्या काळात करावे लागणार आहे. या प्रभागात येणाऱ्या चक्रपाणी वसाहतीचा काही भाग त्याचप्रमाणे गंगोत्री पार्कमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. त्यामुळे या भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांद्वारे योग्य ती पावले उचलली जाण्याची गरज आहे.
वाहनतळाचीही आवश्यकता
प्रभागातील चार मजली वाहनतळाचे उद्घाटन होऊन आठ महिन्यानंतरही ते सुरू झालेले नाही. हे वाहनतळ वाहन चालकांसाठी अल्पदरात उपलब्ध करून दिल्यास आळंदी रस्त्यावर दुतर्फा लावण्यात येणाऱ्या वाहनांपासून सुटका होईल. त्याचप्रमाणे रस्त्याची रुंदी वाढून रस्त्यावर होत असलेल्या वाहनांच्या कोंडीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण होईल. त्याचप्रमाणे बराच गाजावाजा करत कै. सखूबाई गवळी उद्यानात सुरू केलेले संगीत कारंजे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेतच आहे.
सामंजस्याची जबाबदारी
याशिवाय प्रभागातील आळंदी रस्त्यावरील शास्त्री चौक ते चक्रपाणी वसाहतीकडे जाणारा रस्ता, दिघीतील पंचशील बुद्धविहारसमोरील रस्ता आदींसह काही भागातील रस्ते मूळ मालकांच्या विरोधामुळे अद्यापपर्यंत विकसित होऊ शकले नाहीत. मूळ मालक आणि महापालिका यांच्यामध्ये सामंजस्य घडवून मूळ जागामालकांना महापालिकेद्वारे योग्य तो मोबदला मिळवून देऊन हे रस्ते विकसित करण्याची मोठी जबाबदारीही नवनिर्वाचित नगरसेवकांवर राहणार आहे.
भोसरीत उद्भवणाऱ्या नागरी समस्या महापालिकेच्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समन्वय साधून सोडविल्या जातील. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगरसेवकांद्वारे प्रभागातील मांडल्या जाणाऱ्या विविध समस्यांवर सकारात्मक कारवाई करून त्या सोडविल्या जातील.
- तानाजी नरळे, इ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
BHS26B03419
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.