पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक सर्व शेतकऱ्यांना देशातील बँकिंग व्यवस्थेअंतर्गत पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी बॅंकांनी मोहीम स्तरावर प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, नाबार्डचे रोहन मोरे, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, यावर्षीही चार हजार कोटींच्या पीक कर्ज आराखड्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुरवातीपासून प्रयत्न करावेत. २४ एप्रिल ते १ मे या कालावधीत प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक एक कोटी ३३ लाख शेतकऱ्यांचा किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत समावेश करण्यासाठी प्रत्येक बँक शाखेच्या पातळीवर प्रयत्न करावेत. त्यासाठी प्रत्येक शाखेसाठी समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करून दररोज मोहिमेचा आढावा घेण्यात यावा. सर्वांनी जिल्ह्याला मोहिमेत प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
कारेगावकर म्हणाले, २४ एप्रिल रोजी प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येणार आहे. बँक प्रतिनिधींनी या ग्रामसभेत सहभागी होण्याचा प्रयत्न करावा आणि किसान क्रेडीट कार्डचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती घ्यावी. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात यावी.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ ही विशेष मोहीम राबविणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आजवर बँकांकडून पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड घेतलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी शेतीसाठी खेळते भांडवल म्हणून या योजनेअंतर्गत पैसे घ्यावेत आणि त्याचा उपयोग करून आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवावे. शेतकरी बांधवांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.