Kanchan Sarode and Pradip Sarode sakal
पुणे

Andhalgaon News : आंधळगावच्या वीरपत्नीच्या आयुष्याची संघर्षगाथा! पतीचे भारत-पाकिस्तान युद्धात वीरमरण

घरातील कर्ता पुरुष सीमेवर भारत- पाकिस्तान युद्धात धारातीर्थी पडला. नवविवाहित वीर पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला.

सकाळ वृत्तसेवा

- प्रमोल कुसेकर

आंधळगाव - घरातील कर्ता पुरुष सीमेवर भारत- पाकिस्तान युद्धात धारातीर्थी पडला. नवविवाहित वीर पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला. पदरी मूलबाळही नव्हते, पण संकटांपुढे हार मानेल ती वीरपत्नी कसली? चौदा दिवसांचे दुःख संपल्यानंतर तिने पदर खोचला आणि परिस्थितीशी दोन हात केले. आपल्या व्यवस्थेने तिला नाकारले, पण हार न मानता तिने कुटुंबाला सावरले. ही संघर्ष गाथा आहे आंधळगाव (ता. शिरूर) येथील वीरपत्नी कांचन प्रदीप सरोदे यांची.

१९९९ चा काळ होता. कुपवाडा क्षेत्रातील अतिरेक्यांशी अनेक दिवसांपासून लष्कराची चकमक चालू होती. या मोहिमेवर जवान प्रदीप सरोदे सहकाऱ्यांसह मोटारीतून निघाले होते. या मोटारीवरच अतिरेक्यांनी बॉम्बहल्ला केल्याने सात जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. या घटनेत महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश होता. प्रदीप सरोदे हे डिसेंबर १९९४ मध्ये लष्करात भरती झाले.

प्रदीप यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर एक वर्ष बबिना व दीड वर्षे अभोर (पंजाब) येथे त्यांनी सेवा बजावली. एप्रिल १९९९ पासून जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात ते सेवा बजावत होते. लष्करी सेवेत असतानाच त्यांचा विवाह झाला होता. सीमावर्ती भागात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यापासून ते कुपवाडा येथेच होते. ते शहीद झाले तेव्हा त्यांचे वय २३ वर्षे होते. तर कांचन यांचे वय २० वर्षे होते.

या जवानांच्या बलिदानाची आठवण आज संपूर्ण तालुका काढत आहे. आंधळगावचे प्रदीप सरोदे, ढोकसांगवीचे फक्कड पाचंगे व केंदूरचे मेजर प्रदीप ताथवडे या तीन सुपुत्रांनी तालुक्याचे नाव कारगिल लढ्याच्या निमित्ताने अजरामर केले आहे. डिसेंबर १९९४ मध्ये लष्करात दाखल झालेले सरोदे यांनी पाच वर्षांच्या सेवेत प्रत्यक्ष युद्धात दोनदा भाग घेतला. लष्करी सेवेत असतानाच त्यांचा कांचन यांच्याशी विवाह झाला.

वीर जवानांच्या पत्नींना शासकीय सेवेत सामावून घेण्याची घोषणा सरोदेंच्या बाबतीत मात्र हवेत विरली आहे. परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या कांचन सरोदे यांनी नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज-विनंत्या व पत्रव्यवहार केला. मात्र त्यांची बोळवण करण्यात आली.

‘वीर जवानांच्या पत्नींना शासकीय सेवेत सामावून घेणे आम्हाला बंधनकारक नाही’, असे आश्चर्यचकित करणारे उत्तरही एका शासकीय कार्यालयातून मिळाल्याचे कांचन सांगतात. भूमिहीन असलेल्या या कुटुंबाला शासकीय जमीन अद्याप मिळालेली नाही. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री ते जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांकडे सरोदे यांनी नोकरीसाठी अर्ज केले होते. मात्र काही उपयोग झाला नाही.

ग्रामस्थ व कुटुंबीयांनी आंधळगाव येथे शहीद प्रदीप सरोदे यांचे स्मारक उभारले आहे. या स्मारकासमोर नतमस्तक होण्यासाठी तालुक्यातील अनेक नागरिक दररोज येथे येत आहेत.

कांचन यांनी दाखवलेल्या जिद्दीच्या जोरावर आज हे कुटुंब सुस्थितीत आहे. प्रदीप यांच्या हौतात्म्यानंतर कांचन यांनी कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता, माहेरी न जाता सासरलाच आपले सर्वस्व मानले. सरोदे कुटुंबाने तिला मुलगी मानले. त्यामुळे त्यांच्याकडे एक आदर्श वीरपत्नी म्हणून पाहिले जात आहे.

पतीच्या निधनानंतर बनली कुटुंबाचा आधार

पती प्रदीप यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर सासरे सुधाकर, सासू कमल, दीर योगेश, अविनाश यांच्यासोबत कुटुंब दुःखाच्या छायेत होते. मात्र वीरपत्नी कांचन यांनी आपले दुःख बाजूला सारले. शासनाच्या मदतीतून मिळालेल्या गॅस एजन्सी व पेट्रोल पंपाच्या माध्यमातून सासरे व दीर यांना सोबतीला घेऊन आपल्या कुटुंबाच्या त्या आधार बनल्या आहेत. पतीच्या निधनानंतर आजही त्या कुटुंबप्रमुख म्हणून गेल्या २५ वर्षांपासून समर्थपणे जबाबदारी पेलत आहेत.

कुटुंबाला लष्करी सेवेची परंपरा

जवान प्रदीप सरोदे पाच वर्षे लष्करी सेवेत होते. त्यांचे वडील सुधाकर सरोदे हेदेखील १९ वर्षे लष्करात होते. प्रदीप सरोदे यांचे आजोबा हंगोबा सरोदे व चुलते मधुकर सरोदे यांनीदेखील लष्करात सेवा बजावली. १९८९ मध्ये वडील सुधाकर सरोदे निवृत्त झाले, तेव्हा ते कुपवाडा येथेच नेमणुकीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT