अमेरिकेसमोर भारताचे नमते धोरण
व्यापार कराराचा संदर्भ देत राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २० ः ‘‘अमेरिकेसोबत करण्यात आलेल्या व्यापार कराराकडे पाहिले तर भारताने अमेरिकेसमोर पूर्णपणे नमते घेतलेले दिसून येते. या करारामुळे भारताकडून अमेरिकेला जास्त लाभ मिळणार असून आणि त्या बदल्यात भारताला कमी लाभ मिळणार आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच अमेरिकेला खूश करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी का दिला जात आहे? अशी विचारणाही राहुल यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समाज माध्यमातून केली आहे.
‘‘संसदेतील भाषणामध्ये मी जिउ-जित्सू नावाच्या खेळाचा उल्लेख केला होता. त्या खेळामध्ये एखाद्याला पकडत अथवा दाबत नियंत्रणाखाली आणले जाते. राजकारणातदेखील अशा प्रकारचे दबाव असतात, जे बाहेरून दिसून येत नाहीत. व्यापार करारामुळे भारत डेटा कॉलनी बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा अर्थ देशातील डेटा दुसऱ्याच्या हातात जाऊ शकतो. अमेरिकेहून तेल तसेच इतर वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची परवानगी कशासाठी देण्यात आली. दरवर्षी १०० अब्ज डॉलरने आयात वाढविण्याची परवानगी देण्यात आली आहे, यावरही पंतप्रधानांनी खुलासा केला पाहिजे. पंतप्रधानांना पकडले जाणे आणि त्यांच्यावर टाकण्यात आलेला दबाव हे आत्मसमर्पणाचे खरे कारण आहे,’’ असे गांधी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांवर दबाव
पंतप्रधान मोदी यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आहेत. एकीकडे अमेरिकेचा दबाव तर दुसरीकडे सीमेवर चीन उभा आहे. या दबावाखाली व्यापार करार झाला आहे. करारामुळे कृषी, कापड उद्योग आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते. देशाचे स्वातंत्र्य आणि हित लक्षात घेता अमेरिकेसोबत व्यापार करार व्हावयास नको होता, असेही गांधी यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.