रेल्वेत ५२ आठवड्यांत ५२ सुधारणा
केंद्रीय मंत्री वैष्णव ः डिजिटल सुधारणांचा नवा टप्पा सुरू
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २६ ः भारतीय रेल्वेमध्ये व्यापक तांत्रिक आणि डिजिटल सुधारणांचा नवा टप्पा सुरू झाला असून ‘५२ आठवड्यांत ५२ सुधारणा’ या उपक्रमांतर्गत महत्त्वाच्या सुधारणा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ‘रेल टेक धोरण’, ‘रेल टेक पोर्टल’ आणि ‘ई-रेल्वे दावा न्यायाधिकरण’ यांचे औपचारिक अनावरण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘रिफॉर्म्स एक्सप्रेस’ संकल्पनेचा हा भाग असून, रेल्वेमधील नवोन्मेष, सुरक्षितता आणि सेवा गुणवत्तेला गती देणे हा या सुधारणांचा मुख्य उद्देश असल्याचे वैष्णव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले की, रेल टेक धोरणांतर्गत रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जाणार असून नवोन्मेषक, स्टार्टअप्स, उद्योग आणि शैक्षणिक संस्था थेट रेल्वेशी जोडल्या जाणार आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवाशांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची स्थिती, तांत्रिक निकष आणि सुरक्षिततेशी संबंधित बाबी तपासण्यासाठी एआय-आधारित प्रणाली वापरण्यात येणार आहेत. रेल्वे मार्गावर येणाऱ्या हत्तींचा शोध घेणारी प्रणाली, डब्यांमध्ये आग लागण्याचे प्रकार शोधणारी यंत्रणा, तुटलेली रेल्वे लाईन ड्रोनद्वारे शोधणारी व धुक्यात अडथळे शोधणारी यंत्रणा, पार्सल डब्यांवरील सेन्सर आधारित वजन मोजणी, तसेच डब्यांवरील सौर पॅनेल यांसारख्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा यात समावेश आहे.
नवोन्मेषाला चालना देण्यासाठी ‘रेल टेक पोर्टल’ सुरू करण्यात आले असून, यामुळे एकाच टप्प्यात प्रस्ताव सादर करता येणार आहेत. प्रकल्पांच्या विस्तारासाठी दिले जाणारे अनुदान वाढवण्यात आले असून प्रोटोटाइप विकास आणि चाचणीसाठीची आर्थिक मदतही अधिक करण्यात आली आहे.‘‘ नागरिककेंद्रित सुधारणेचा भाग म्हणून ‘ई-रेल्वे दावा न्यायाधिकरण’ सुरू करण्यात आले आहे. देशभरातील २३ रेल्वे दावा न्यायाधिकरण खंडपीठे डिजिटल पद्धतीने जोडली जाणार असून, नागरिकांना कोणत्याही ठिकाणाहून, चोवीस तास ऑनलाइन पद्धतीने दावे दाखल करता येणार आहेत. त्यामुळे प्रकरणांचा निपटारा अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे,’’ असे वैष्णव यांनी सांगितले.
ठळक मुद्दे
- कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रवासी सुरक्षितता, रूळ तपासणी आणि सेवा गुणवत्ता वाढवण्यावर भर
- नवोन्मेषक, स्टार्टअप्स, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना रेल्वेशी थेट जोडणारे रेल टेक पोर्टल सुरू
- देशभरातील २३ रेल्वे दावा न्यायाधिकरण खंडपीठे डिजिटल; चोवीस तास ऑनलाइन दावे दाखल करण्याची सुविधा.
- गतिशक्ती मालवाहतूक टर्मिनल्स आणि सेवा-प्रवेश प्रक्रियेत सुधारणांमुळे रेल्वे अधिक सुरक्षित, आधुनिक व कार्यक्षम करण्याचा उद्देश.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.