पुणे - घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात. आई-वडील आपला तिरस्कार करतात, त्यांना आपण नकोसे आहोत, अशी भावना त्यांच्या मनात बालपणापासूनच निर्माण होते, अशी माहिती वकिलांनी दिली.
३० ते ४० वयोगटांत विभक्त झालेल्यांना शक्यतो अपत्ये असतात. त्यामुळे आई-वडिलांच्या भांडणात त्यांची फरपट होते. त्या दोघांचा जरी घटस्फोट झाला तरी मुलांची आई-वडिलांबरोबर असलेली प्रेमाची नाळ तुटलेली नसते. दुर्दैवाने त्यांना कोणातरी एकाचाच सहवास लाभतो. कमी वयात त्यांना हा आघात सोसावा लागतो. त्यामुळे दूर झालेल्या आई किंवा वडिलांचे प्रेम दुसऱ्या पालकांकडून मिळेल, अशी आशा त्यांना असते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली.
सर्वंच प्रकरणांत अशा मुलांना दुसऱ्या पालकांकडून पुरेसे प्रेम मिळतेच असे नाही. त्यामुळे ते आपल्या आई किंवा वडिलांवर दुसरे लग्न केले म्हणून नाराज होऊ लागतात.
पालकांविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण होते. पालकांकडून त्रास देण्यात आला, तर त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे एकटेपणा येणे, कुटुंब व समाजाविषयी राग निर्माण होणे, वाईट सवयी लागणे, बोलणे टाळणे, शुल्लक गोष्टींवरून चिडणे असे परिणाम मुलांवर होतात असे वकिलांनी सांगितले.
मुलांवर असा प्रसंग ओढावला, तर त्यांचा विकास थांबतो. त्यांची बौद्धिक वाढही खुंटते. त्यातून त्यांच्यावर मानसिक ताण येण्याची शक्यता असते. मुलांकडे लक्ष दिले नाही तर त्यांचे भवितव्य धोक्यात येते.
- ॲड. प्रगती पाटील
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.