पुणे - 'आमची पिढी "फॅन्टसी'मध्ये रमणारी होती. नवी पिढी ही वास्तवाला महत्त्व देणारी असून, त्यांना वास्तवावर आधारित चित्रपट आवडतात. म्हणूनच चित्रपटामध्ये संवाद किंवा अन्य गोष्टींवर भर देण्यापेक्षा वास्तव मांडण्यास अधिक प्राधान्य द्या,'' असे मत इटलीचे ज्येष्ठ दिग्दर्शक माऊरिझिओ निकेती यांनी रविवारी व्यक्त केले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये "विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान' अंतर्गत "पटकथा लेखन' या विषयावर व्याख्यान झाले. त्यामध्ये निकेती यांच्यासह मेक्सिकन दिग्दर्शक रोड्रिगो प्ला सहभागी झाले होते. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आपल्या असंख्य चित्रपट, कार्टून व लघुपटांची माहिती देत निकेती यांनी "इटालियन' चित्रपटाची सद्यःस्थिती मांडली. ते म्हणाले, 'संवाद हे रंगभूमी, पुस्तक व आकाशवाणीसाठी वापरणे योग्य आहे. मात्र, चित्रपटासाठी संवादाची गरज नाही. कारण, चित्रपट हे दृश्यात्मक माध्यम आहे. त्याद्वारे तो क्षण, भाव व्यक्त झाला पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर "इझम' निर्माण व्हायला लागला. त्यानंतरच्या काळामध्ये वास्तवाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. नेमके तीच वास्तववादी भूमिका आजची तरुण पिढी स्वीकारत आहे.'' चित्रपटाचा खर्च व दर्जाविषयी निकेती म्हणाले, 'माझ्या चित्रपटासाठी पत्नी व मी वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी सांभाळतो. त्यामुळे आमच्या चित्रपटाला जास्त खर्च येत नाही. कमी पैशात चांगला चित्रपट तयार होतो. याउलट भरपूर पैसा वापरून चित्रपट तयार करणारेही खूप आहेत; मात्र त्याचा दर्जा खरोखरच किती चांगला आहे, हा प्रश्न आहे.'' डॉ. पटेल म्हणाले, ""भारतीय सिनेमा हा स्वप्नामध्ये रमणारा होता, नव्या पिढीने हे चित्र बदलण्याचा चांगला प्रयत्न केला. ते चित्रपटामध्ये वास्तवाला अधिक प्राधान्य देत आहेत.'' पटकथा लिहिताना त्यातील पात्र केंद्रस्थानी ठेवून त्याला घटना, प्रसंग, संवाद व मानवी भावभावनांची जोड दिली पाहिजे. तेव्हाच परिपूर्ण पटकथा होऊ शकते. अमेरिकन चित्रपटांमध्ये व्यक्तीरेखेभोवती संपूर्ण कथानक फिरते. त्यादृष्टीने चित्रीकरणामध्ये वैविध्य आणले जाते. आपण समाजामध्ये फिरत असताना जे पाहतो, ते प्रत्येकवेळी नमूद केल्यास पटकथा लेखनामध्ये तसे प्रसंग वापरता येऊ शकतात. - रोड्रिगो प्ला, दिग्दर्शक, पटकथाकार |