पुणे - 'न्यायतत्त्वानुसार पुरुषांप्रमाणे महिलाही विविध क्षेत्रांत कार्यरत असाव्यात. मात्र पूर्वी महिलांची गणना जणू वस्तुरूप म्हणून केली जात होती. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विचारांतील भेदभाव नष्ट झाले पाहिजेत. पुरुष मानसिकतेच्या परिवर्तनातूनच निर्णय प्रक्रियेत स्त्रीला स्थान मिळेल,'' असे मत खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र, दीनदयाळ शोध संस्थान (दिल्ली), संस्कृती मंत्रालय आयोजित "निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी स्त्री' या चर्चासत्रात ते बोलत होते. प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे, दीनदयाळ शोध संस्थानच्या अध्यक्ष डॉ. पूर्णिमा अडवानी, गीता गुंड, मध्य प्रदेशच्या महिला व बालकल्याण मंत्री अर्चना चिटणीस, अंजली देशपांडे उपस्थित होते. तत्पूर्वी आयोजित चर्चासत्रात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, भीम रासकर यांनीही विचार व्यक्त केले. सहस्रबुद्धे म्हणाले, 'सार्वजनिक व खासगी क्षेत्रातही आता महिलांनी त्यांचे स्थान निर्माण केले आहे. अगदी पौरोहित्यदेखील महिला करू लागल्या आहेत. इस्रोमध्येही अनेक महिला शास्त्रज्ञ आहेत. सर्वच क्षेत्रांत महिलांचे योगदान वाढले आहे. मात्र स्त्रीला समाजात समान वागणूक देण्याच्या दिशेने अधिकाधिक प्रयत्न व्हावेत.'' चिटणीस म्हणाल्या, 'महिलांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवे. कारण घरापासूनच महिला वेगवेगळ्या कार्यात सक्रिय असतात.'' गोऱ्हे म्हणाल्या, 'गेल्या तीस-चाळीस वर्षांत महिलांविषयी पुष्कळसे परिवर्तन घडले आहे. परंतु अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव आहे. पुरुषांप्रमाणे महिलांनासुद्धा समानतेचा अधिकार आहे.'' रहाटकर म्हणाल्या, 'राजकीय क्षेत्रात महिला सक्रिय आहेत. परंतु अनेक विषयांत त्यांचे पतीच निर्णय घेतात. नगरसेविकांनी त्यांच्या पतींना सभागृहात आणू नये. तर स्वतःहून सामाजिक कार्यात सहभागी व्हायला हवे. त्याद्वारेच स्त्री शक्तीचा विकास होईल.'' घोले रस्ता - "निर्णयप्रक्रियेत केंद्रस्थानी स्त्री' या विषयावरील चर्चासत्रात विचार व्यक्त करताना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे. या वेळी (डावीकडून) विजया रहाटकर, गोऱ्हे, डॉ. पूर्णिमा अडवानी, भीम रासकर. |