सांगली जिल्हा बँक परीक्षेची केंद्रे बदला
मानसिंगराव नाईक : आयबीपीएसकडे बँकेची मागणी; प्रसंगी परीक्षा पुढे ढकला
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४४४ लिपिक पदांच्या लेखी परीक्षेची केंद्रे बीड, नांदेड, धुळे, नंदुरबार आणि अकोला जिल्ह्यांत देण्यात आल्याने सांगलीतील उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही केंद्रे बँकेलाही मान्य नसून, उमेदवारांची परीक्षा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांतच घ्यावी. प्रसंगी परीक्षा महिनाभर पुढे ढकलावी, उमेदवारांची गैरसोय टाळावी, अशी मागणी आयबीपीएसकडे केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली.
अध्यक्ष नाईक म्हणाले, की जिल्हा बँकेतील लिपिक पदाच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या सांगली जिल्ह्यातील हजारो उमेदवारांना बीड, नांदेड, अकोला, धुळे, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. या परीक्षेसाठी १३ हजार उमेदवार हे जिल्ह्यातील असून, सुमारे १० हजार ५०० उमेदवारांची परीक्षा सांगलीबाहेर होणार आहे. परीक्षार्थींमध्ये सुमारे ४० टक्के महिला उमेदवार आहेत सांगलीपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या या केंद्रांवर पोहोचण्यासाठी उमेदवारांची मोठी गैरसोय होणार आहे.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना सांगलीसह शेजारील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांना प्राधान्यक्रम दिला होता. मात्र, याचा विचार न करता परीक्षा प्रक्रिया राबविणाऱ्या आयबीपीएस कंपनीने शेकडो किलोमीटर दूर असलेल्या जिल्ह्यांत परीक्षा केंद्रे दिली आहेत. या निर्णयामुळे उमेदवारांसह त्यांच्या पालकांमध्येही तीव्र रोष निर्माण झाला. बँकेच्या संचालक मंडळाची तातडीची या बाबत बैठक सोमवारी (ता. २४) घेतली.
जिल्हा बँकेच्या नोकरभरतीत भूमिपुत्रांना न्याय मिळावा, अशी संचालक मंडळाची भूमिका आहे. दूर असलेल्या जिल्ह्यांत परीक्षा केंद्रे दिली आहे. ही केंद्रे बँकेला मान्य नाहीत त्यामुळे ती तातडीने रद्द करावीत. प्रसंगी परीक्षा महिनाभर पुढे ढकलावी लागली तरी हरकत नाही; मात्र सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांतच परीक्षा केंद्रे द्यावीत, अशी मागणी आयबीपीएस कंपनीकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे. या बाबत आयबीपीएसकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास अध्यक्ष नाईक यांनी व्यक्त केला.
चौकट ---
जिल्ह्यातील नामांकित
महाविद्यालयांची केंद्रे वगळली
जिल्ह्यात अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा आणि परीक्षा घेण्यासाठी आवश्यक सुविधा असलेली वालचंद महाविद्यालय, आरआयटी आणि अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाचा समावेश आहे. मात्र आयबीपीएस कंपनीने जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयातील अत्याधुनिक संगणक लॅब असलेली परीक्षा केंद्रे वगळण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.