पुणे - ‘‘आदिम काळापासून वर्तमानकाळापर्यंत निरनिराळ्या टप्प्यांत मानवी जीवनात आलेल्या अनुभवांची भर पडत गेली. त्यांतील सखोल अर्थ सर्व बाजूंनी विचार करून जाणून घ्यावेत. त्याने आपली प्रगल्भता वाढते. चिमटीएवढ्या अहंकारातून बाहेर येऊन आपण मोकळे होतो. लिहू-वाचू न शिकणाऱ्यांच्या गाठीशी लोकपरंपरेने आलेले शहाणपण असते, त्याची जाणीव शिकलेल्यांनी ठेवावी,’’ असे परखड मत लोकपरंपरा व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी आज व्यक्त केले.
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या पस्तिसाव्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्यांनी हे भाष्य केले. हा कार्यक्रम कोथरूडमधील हॅपी कॉलनी सभागृहात झाला. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. उज्ज्वला गोखले यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे, डॉ. नीलिमा गुंडी व जोत्स्ना आफळे उपस्थित होत्या.
दिवसभर चाललेल्या या संमेलनात प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मिलिंद वाटवे यांच्या विविधांगी अभ्यासासंदर्भात लीना दामले यांनी त्यांची मुलाखत घेतली.
ते म्हणाले, ‘निसर्गात खूप काही असे आहे, जे अजून आपण पाहिले नाही. या क्षेत्रात वर्षांनुवर्षे काम होऊनही जेमतेम दोन-पाच टक्के माहितीच माणसाला होऊ शकली आहे. विशेषत: सूक्ष्म जीवांबद्दल तर पूर्ण अंधारच आहे.’’
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व प्रसिद्ध कवी कृ. ब. निकुंब यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित रंगतदार कार्यक्रम सदस्यांनी सादर केला. नंतर डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित ‘परवा आमचा पोपट वारला’ या कथेचे बहारदार अभिवाचन ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.