सोयाबीन बीजोत्पादनातून गाव
समृद्ध होईल : डॉ. मिलिंद देशमुख
ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : सुधारित वाणांचे बीजोत्पादन घेताना रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर, योग्य अंतर, नियमित पीक निरीक्षण आणि वेळेवर कीटकनाशक व बुरशीनाशकांची योग्य फवारणी केल्यास शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन घेता येईल. या सोयाबीन बीजोत्पादनातूनच गावाचा आर्थिक विकास होऊन समृद्धी येईल, असा विश्वास ‘फुले संगम’, ‘फुले किमया’ व ‘फुले दूर्वा’ या प्रसिद्ध वाणांचे जनक तथा ज्येष्ठ सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांनी व्यक्त केला.
चिंचनेर निंब (ता. सातारा) येथे सोयाबीन बीजोत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित शेतकरी-शास्त्रज्ञ थेट सुसंवाद कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. मानवी आहारात प्रथिनांचे महत्त्व लक्षात घेऊन नवीन वाणांचा शोध घेणे ही काळाची गरज असल्याचेही डॉ. देशमुख यांनी नमूद केले.
या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. महेश बाबर यांनी गावातील बीजोत्पादन उपक्रमाची रूपरेषा मांडली, तर संग्राम पाटील यांनी सोयाबीन समूह आद्यरेखा प्रात्यक्षिकांची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी लागवडीबाबत विचारलेल्या विविध शंकांचे तज्ज्ञांनी निरसन केले.
सुसंवादानंतर तज्ज्ञांनी थेट सोयाबीन प्रात्यक्षिक शेताची पाहणी करून पीक परिस्थितीनुसार उपाययोजना सुचविल्या. विजय जाधव यांनी आजवर राबवलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकृषी अधिकारी सुजित शिंदे यांनी केले, तर उपकृषी अधिकारी धनाजी फडतरे, ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे) कार्यक्रमाचे सर्व विद्यार्थी आणि स्थानिक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. रावे विद्यार्थी सुजल याने आभार मानले.