भोर, ता. ९ ः लाखो रुपये किमतीच्या दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करणारी टोळी पकडण्यात भोर व महाड (जि. रायगड) वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. वन विभागाने शनिवारी (ता. ८) तस्करीच्या टोळीतील ५ जणांना अटक केली. यात सहभागी असणारे अजून पाच जण पळून गेले आहेत.
शनिवारी सकाळी दत्तात्रेय मिसाळ यांना कोल्हापूर येथील वन विभागाच्या मानद सचिवांकडून भोरच्या वरंधा घाटात खवल्या मांजराची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वन विभागाने नकली ग्राहक बनवून वरंधा घाटात सापळा लावला. परंतु, तस्करीसाठीचे लोक आलेच नाहीत. तस्करी करणारे सर्वजण हे महाडमधील टोळ बुद्रुक या गावात असल्याचे समजले. त्यानंतर मिसाळ यांनी महाडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश साहू यांच्याशी संपर्क साधला. दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टोळ बद्रुक गावात छापा टाकला. त्यावेळी टोळीतील पाच जणांना पकडण्यात यश आले. मात्र, पाच जण पळून गेले.
आरोपींकडून एक जिवंत खवले मांजर ताब्यात घेण्यात आले. याशिवाय आरोपींकडून ३ दुचाकीही जप्त केल्या. या आरोपींकडून वन्य पशूपक्षांची मोठ्या प्रमाणात तस्करी केल्या असण्याची शक्यता वन विभागाकडून वर्तवली जात आहे. यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या कारवाईमध्ये भोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रेय मिसाळ, वनपरिमंडळ अधिकारी संदीप खट्टे, वन अधिकारी आशा भोंग, वनरक्षक पांडुरंग गुट्टे, शिवकुमार होनराव, वनरक्षक थोरात, वनरक्षक कृष्णा देठे, बी. के. अडागळे, खाशीम हिमोने व संदीप थोरात यांच्यासह महाडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश साहू यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची वन कोठडी देण्यात आली. पुढील तपास महाडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश साहू करीत आहेत.
34297
34298
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.