पळसदेव, ता. २५ : घरकुल योजनेचा पहिला हप्ता घेऊनही काम सुरू न करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील ४०६१ लाभार्थ्यांचे घरकुल रद्द करण्यात येणार आहे. संबंधितांकडून हप्त्याची रक्कम वसूल करून त्यांच्या मिळकतीवर बोजा चढविण्याचा इशारा गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी दिला आहे.
तालुक्यात २०१६-१७ पासून पंतप्रधान आवास, रमाई, मोदी आवास यांसह विविध योजनांतून बेघरांना १ लाख २० हजारांचा निधी दिला जातो. मात्र, ४ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी १५ हजारांचा पहिला हप्ता घेऊनही अद्याप २६९ चौरस फुटांच्या घराचे बांधकाम सुरू केलेले नाही. ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने आता प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे.
या लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीमार्फत अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे. मुदतीत काम सुरू न केल्यास घरकुल मंजुरी रद्द करून दिलेली रक्कम वसूल केली जाईल. पैसे परत न केल्यास लाभार्थ्यांच्या सातबारा किंवा मिळकत पत्रिकेवर सरकारी बोजा नोंदविण्याची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे खुडे यांनी स्पष्ट केले.