काटेवाडी, ता. ९ : कृत्रिम आणि प्लॅस्टिकच्या फुलांनी जिल्ह्यातील फूल बाजारपेठेचा ७० टक्के हिस्सा गिळंकृत केला आहे. चीनमधून आयात झालेल्या फुलांमुळे स्थानिक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही अर्थव्यवस्था कोमेजली आहे. शेतकरी संकटात सापडल्याने विधानसभेत सोमवारी (ता. ८) धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पर्यावरण विभागासोबत बैठक घेण्याचे आश्वासन फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांनी राज्य सरकारला सामाजिक जागरूकता मोहीम राबवून नैसर्गिक फुले वापरण्यास प्रोत्साहन देण्याची विनंती केली आहे. सरकारच्या पुढील निर्णयाकडे शेतकरी, पर्यावरणवादी आणि फूल बाजारपेठेशी निगडित सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली, बारामती, इंदापूर आणि शिरूर तालुके फूल शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. गोगावले यांनी विधानसभेत सांगितले की, कृत्रिम फुलांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन पर्यावरण विभाग आणि लोकप्रतिनिधींसोबत अधिवेशनकाळात बैठक घेतली जाईल. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विधानसभा सदस्य महेश शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. अद्याप बंदीचा अंतिम निर्णय झालेला नसला, तरी शेतकऱ्यांनी या आश्वासनाचे स्वागत केले आहे. आगामी गौरी-गणपती, दसरा आणि दिवाळी सणांमध्ये उत्पादित होणाऱ्या झेंडू, जास्वंद, मोगरा आणि गुलाब यांसारख्या नैसर्गिक फुलांना मागणी मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने बंदीची मागणी केली आहे.
असा होतोय शेतकऱ्यांवर परिणाम
* प्लॅस्टिकच्या फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या मागणीत आणि किमतीत ३० ते ४० टक्के घट
* कमी दर आणि मागणी अभावी पुणे, नाशिक आणि सातारा येथील अनेक शेतकरी कर्जबाजारी
* कृत्रिम फुलांमुळे शेतकरी फूल शेती सोडण्याच्या मार्गावर
* सण-उत्सव, लग्न आणि घरगुती कार्यक्रमात प्लॅस्टिक फुलांचा वापर वाढला
* प्लॅस्टिमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढून माती आणि पाण्याचे प्रदूषणात भर
* स्वस्तात उपलब्ध होणारी आयातीत कृत्रिम फुलांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका
* गौरी-गणपती, दिवाळी यांसारख्या सणांमध्ये फुलांचे महत्त्व होतेय कमी
* कृत्रिम फुलांच्या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत टिकणे बनले अवघड
* फूल शेतीशी निगडित मजूर आणि छोटे व्यापाऱ्यांचे उत्पन्न घटले
प्लास्टिक तसेच आर्टिफिशियल फुलांवर बंदी आल्यास त्याचा फूल व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे. नैसर्गिक फुलांच्या मागणीमध्ये यामुळे वाढ होईल. शेतकऱ्यांना किंवा ३० ते ४० टक्के दर वाढवून मिळतील.
- नितीन झगडे, फूल व्यापारी बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती
कृत्रिम आणि प्लॅस्टिकच्या फुलांची लोकांमध्ये इतकी सवय झाली आहे की नैसर्गिक फुलांना ही लोक विसरू लागली आहे. मंदिरात देवांना वाहण्यासाठी सुद्धा प्लास्टिकची फुले घेऊन जातात. तसेच घरच्या सजावटीला देखील प्लास्टिकचे फुले वापरली जातात. खरे तर पर्यावरणासाठी अतिशय घातक असणारी या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी आली तर फूल व्यवसायातील शेतकरी, कलाकार, मजूर या सर्वांनाच चांगले दिवस येतील.
- अभिजित जगताप, फूल उत्पादक शेतकरी, बोरी (ता. इंदापूर)
29922
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.