काटेवाडी, ता. १३ : शाश्वत शेतीसाठी पीक फेरपालट ही एक महत्त्वाची आणि प्रभावी पद्धत आहे. दरवर्षी एकच पीक घेत राहिल्यास मातीची सुपीकता कमी होते, उत्पादन घटते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. पीक फेरपालटाचा अवलंब केल्यास मातीचे आरोग्य सुधारते, किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, जमिनीची सुपीकता कायम राहते आणि उत्पादनात वाढ होते, अशी माहिती बारामतीतील उपविभागीय कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी दिली.
शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान, मातीचा प्रकार आणि बाजारपेठेची मागणी यांचा विचार करून पीक फेरपालट योजनेची आखणी करावी. उदाहरणार्थ, कोरडवाहू शेतीत ज्वारी-हरभरा किंवा बाजरी-तूर अशी फेरपालट यशस्वी ठरू शकते, तर बागायती शेतीत भात-डाळवर्गीय पिके किंवा ऊस-भाजीपाला असे नियोजन करता येते. पीक फेरपालट हा शाश्वत शेतीसाठी साधा पण परिणामकारक उपाय आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि पर्यावरणाचे संरक्षण होते. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करून शेतीला अधिक उत्पादक आणि टिकाऊ बनवावे, असे आवाहन कृषी तज्ञांनी केले आहे.
पीक फेरपालट का आवश्यक आहे?
मातीतील पोषक द्रव्यांचा असमतोल:
सातत्याने एकच पीक घेतल्यास मातीतील विशिष्ट अन्नद्रव्ये, जसे की नायट्रोजन किंवा पोटॅशियम, कमी होतात. यामुळे जमिनीचा पोत बिघडतो.
किडी-रोगांचा वाढता प्रादुर्भाव: एकाच पिकावर अवलंबून राहिल्यास त्या पिकाला बाधा पोहोचवणाऱ्या किडी आणि रोग मातीत स्थायिक होतात.
उत्पादनात घट: मातीची सुपीकता कमी झाल्याने पिकांचे उत्पादन घटते आणि शेतकऱ्यांना कीटकनाशके व खतांचा जास्त वापर करावा लागतो, ज्यामुळे खर्च वाढतो.
अशी करा पीक फेरपालट
पिकांचे साम्य टाळा: मुख्य पिकाच्या मागील पिकाशी साम्य टाळावे. उदाहरणार्थ, खोल मुळे असलेल्या पिकानंतर (जसे की बाजरी) उथळ मुळे असलेले पीक (जसे की भुईमूग) घ्यावे.
विविध घटकांचा विचार: मूळ खोली, पोषण गरज, किडी-रोगांचे प्रकार आणि कालावधी यांचा विचार करून पीक फेरपालट करावा.
.
पीक फेरपालटाचे फायदे.
मातीचे आरोग्य: वेगवेगळ्या पिकांच्या पोषण गरजा वेगळ्या असतात, त्यामुळे मातीतील अन्नद्रव्यांचा समतोल राखला जातो.
किडी-रोग नियंत्रण: पीक फेरपालटामुळे किडी आणि रोगांचे चक्र तुटते, ज्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो.
उत्पादनात वाढ, खर्चात बचत: मातीचा पोत सुधारल्याने उत्पादन वाढते आणि खतांचा खर्च कमी होतो.
नैसर्गिक खत: काही पिकांचे आच्छादन आणि मुळे मातीची धूप रोखतात आणि पुढील पिकांसाठी नैसर्गिक खत म्हणून काम करतात.
मागील पिढीने आपल्याला उपजाऊ व सुपीक जमीन दिली. केवळ एकच पिकाची लागवड वारंवार केल्याने जमिनीचा कस कमी होत जातो. पुढील पिढ्यांना जर सुपीक आणि उपजाऊ जमीन आपल्याला हस्तांतरित करायची असेल तर पीक फेरपालट करणे अत्यंत आवश्यक आहे.
- टी. के. चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी बारामती
------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.